Reddy's company owes salaries to 1,300 workers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात सात वर्षांपासून कचरा संकलनाचे काम करणारया पी. गोपीनाथ कंपनीचे काम नुकतेच महापालिकेने थांबविले आहे. या कंपनीने अद्याप १३०० कंत्राटी कामगारांच्या वाढीव वेतनातील फरकाची रक्कम आणि दोन महिन्याचे वेतन तसेच ग्रॅज्युईटी अद्याप अदा केली नाही. त्यामुळे हे वेतन अदा केल्यानंतरच महापालिकेने देयके अदा करावी, अशी मागणी परिवर्तन कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ राजू मिसाळ यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.
महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी गुजरात येथील नव्या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मागील सात वर्षांपासून शहरात कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणारी पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या कंपनीचे महापालिकेकडे कामाचे थकीत वेतन शिल्लक आहे. हे बील मिळविण्यासाठी कंपनीने महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे. मात्र, या कंपनीकडे कंत्राटी तत्त्वावर घंटागाडी आणि वाहनांवरील चालक, सहाय्यक असे १३०० कामगार कार्यरत होते.
सध्या यातील बहुतांश कामगार नव्या कंपनीकडे वर्ग झाले आहेत. परंतु, या १३०० कामगारांचे थकीत वेतनफरक, ग्रॅज्युईटी तसेच एप्रिल २०२६ चा पगार आणि डिपॉझिट म्हणून रोखून ठेवलेला एक महिन्याचा पगार शिल्लक आहे. हे वेतन दिल्याशिवाय रेड्डी कंपनीचे बिल अथवा डिपॉझिट देऊ नये, अशी मागणी परिवर्तन कामगार संघटनेच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कंपनीकडे सुमारे १३०० कामगार गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असून त्यांना किमान वेतनानुसार वेतन न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगारांच्या हक्काची रक्कम मिळेपर्यंत कंपनीची देयके रोखावीत, अशी मागणी निवेदनात केली आहे.