Record 99.53% voter turnout for District Bank election
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या नवीन संचालक निवडीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरासह प्रत्येक तालुक्यातील एक अशा नऊ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तब्बल २९.५३ टक्के मतदान झाले. एकूण १ हजार ५३ मतदारांपैकी १ हजार ४८ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. राज्याचे मंत्री अतुल सावे, खा. कल्याण काळे यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. रविवारी (दि.५) सकाळी मतमोजणीनंतर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. यापैकी ८ जण पहिलेच बिनविरोध निवडून आले आहेत. तर एका जागेवर कोणीही उमेदवार नाही. त्यामुळे उर्वरित १२ जागांसाठी शनिवारी सकाळी वाजता जिल्हाभरातील नऊ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. शहरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मंत्री अतुल सावे, खा. डॉ. कल्याण काळे, ८ आ. अंबादास दानवे यांनी तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सिल्लोड येथील मतदार केंद्रावर मतदान केले. पहिले दोन तासांत १९.५६ टक्के मतदान झाले.
त्यानंतर मतदानाचा वेग वाढून १२ वाजेपर्यंत ५६.७९ टक्के मतदान केले. तर दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल ८८.९८ टक्के मतदान झाले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १ हजार ५३ मतदारांपैकी १ हजार ४८ जणांनी (९९.५३ टक्के) आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या कडक पोलिस बंदोबस्तात जिल्हा बँकेतील स्ट्रॉग रुमध्ये ठेवण्यात आल्या असून, स्ट्राँग रुमच्या आत व बाहेर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, सहायक किरण चौधरी, विष्णू रोडगे आदी उपस्थित होते.
कोण जिंकणार, आज फैसला
जिल्हा बँकेच्या सभागृहात रविवारी सकाळी ८ वाजता एकूण आठ टेबलावर मतमोजणीला सुरुवात होईल. बँकेच्या १२ जागांसाठी राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल आणि खा. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र शेतकरी सहकार बँक बचाव पॅनलमध्येच थेट लढत आहे. यात मंत्री सावे, खा. काळे, आ. अनुराधा चव्हाण, रंजना जाधव, अंबादास दानवे यांच्यासह अन्य दिग्गज निवडणूक आखाड्यात असल्याने चुरस चांगलीच वाढली आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वांनीच पुरेपूर जोर लावला आहे. मात्र, कोण बाजी मारणार याचा फैसला मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.
पाच तालुक्यांत शंभर टक्के मतदान
बँकेच्या निवडणुकीत कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दोघांनी, सिल्लोड, पैठण, आणि वैजापूर तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच मतदारांनी मतदान केले नसल्याचे समोर आले.
सक्षम नेतृत्व निवडीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री अतुल सावे यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेची प्रगती, शेतकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारे सक्षम नेतृत्व निवडण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.