छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनेमुळे लहान पक्षांवर अन्याय होत असल्याने ही रचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. अन्यथा, याविरोधात रिपाइं न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. २७) पत्रकार परिषदेत दिला.
तसेच भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार रिपाइंला स्वीकृत नगरसेवकपद द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. शहरात आयोजित जागतिक बौद्ध धम्म परिषदेपूर्वी सुभेदारी विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिने कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली नसून तिला फाशी दिल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आठवले म्हणाले.
तसेच, गया येथील महाविहार ट्रस्टवर सर्व सदस्य बौद्ध असावेत, यासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून पंतप्रधानांनाही निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत बोलताना आठवले म्हणाले की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. यात काही घातपात असावा का, याची सखोल चौकशी व्हावी. मात्र, या संदर्भात रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या विचारांशी मी सहमत नाही.