Queues of auto-rickshaws outside Guardian Minister Shirsat's residence
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एलपीजी गॅस मिळत नसल्याने शहरातील रिक्षाचालकांनी रविवारी (दि.२९) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी धाव घेतली. पालकमंत्र्यांच्या घरासमोर रिक्षांच्या रांगा लावत एलपीजी गॅसवर तोडगा काढण्याची मागणी या रिक्षाचालकांनी केली. त्यावर शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करत पंपचालकांना नीट करण्यासाठी त्यांचे पंप सील करा, अशा सूचना केल्या.
शहरात काही दिवसांपासून ऑटो रिक्षांना एलपीजी गॅस मिळत नाही. त्यामुळे रिक्षा चालक हैराण झाले आहेत. परिणामी, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळीच शहरातील बहुसंख्य रिक्षाचालक रिक्षा घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर पोहोचले. तिथे त्यांनी रिक्षांच्या रांगा लावल्या. त्यानंतर शिरसाट यांनी या रिक्षा चालकांना आत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.
एलपीजी पंप चालक मनमानी करत आहेत, ते गॅस खरेदी करत नसल्याने रिक्षांना गॅस मिळत नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यावर मंत्री शिरसाट यांनी लगेचच जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना फोन लावला. शहरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा हा कंपन्यांच्या अरेरावीपणाचा परिणाम आहे.
आपले नियंत्रण नसल्याने गॅस खरेदी केले जात नाही. गॅस आहे मात्र आम्ही खरेदी करणार नाही ही भाषा असल्याने रिक्षा चालकांना त्रास होत आहे. त्यामुळे ऑटो एलपीजी गॅस पंपाच्या एनओसी रद्द करून पेट्रोल पंप सील करून टाका. यानंतर पेट्रोल पंप चालक ठिकाणावर येतील, असे शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी यांना सांगितले. त्यानंतर शिरसाट यांनी सर्व रिक्षा चालकांना हा विषय लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर रिक्षा चालक तेथून परतले.
शहरात एलपीजीचे एकूण १३ ते १४ पंप आहेत. यात गो-गॅसचे चार पंप आहेत. आज सर्वच पंप बंद आहेत. एलपीजी गॅसचा तिढा दराबाबत आहे. या दरावर आपले नियंत्रण नसते. आजचा दर १२० रुपये किलो आहे. आम्ही इतक्या महाग गॅस खरेदी करू शकत नाही असे रिक्षा असोसिएशनचे म्हणणे आहे. शहरात गॅसचे वेगवेगळे दर असल्याची तक्रार अंबादास दानवे यांची होती. याची तपासणी करणार आहोत. दरात तफावत असेल तर गुन्हे दाखल करू.- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी.