Preparations underway for action against 1,040 properties in the city: Marking and measurement in the final stage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात निवासी बांधकामांवर कारवाई करण्यास शासनाने बंदी घातल्याने महापालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम सध्या थांबली असली तरी शहरातील सहा महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मार्गावरील सुमारे १,०४० मालमत्ता रुंदीकरणात बाधित ठरणार असून, त्यांचे मार्किंग, मोजमाप आणि नोटीस बजावण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्ष पाडापाडीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात सहा रस्त्यांवरील अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित रस्त्यांच्या विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे सादर करण्यात आला.
यापैकी पडेगाव रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून, उर्वरित रस्त्यांसाठी निधीची प्रतीक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यातील कारवाईसाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यात चंपा चौक ते जालना रोड, पैठण रोड ते नॅशनल लॉ विद्यापीठ, हसूल गाव, रेणुकामाता कमान ते अहिल्यादेवी होळकर चौक, जयभवानीनगर चौक ते १३ वी योजना आणि औरंगपुरा ते नवाबपुरा या सहा रस्त्यांवरील बाधित मालमत्तांचे सीमांकन, मार्किंग आणि नोटीस बजावण्याचे काम पावसाळ्यातच पूर्ण केले जाणार आहे.
त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष पाडापाडीची मोहीम सुरू करता येणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी शासनाच्या नियमांनुसार सध्या केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून, सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्त येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जुन्या विकास आराखड्यावर प्रशासन ठाम
नुकत्याच मंजूर झालेल्या विकास आराखड्यात काही रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली असली तरी भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन जुन्या विकास आराखड्यातील रुंदी कायम ठेवण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठविण्याची तयारी सुरू असून, जुन्या आराखड्यानुसारच रस्ते रुंद करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे.
या सहा रस्त्यांवर होणार कारवाई
चंपा चौक ते जालना रोड १५० मालमत्ता (३० मीटर), पैठण रोड ते नॅशनल लॉ विद्यापीठ २० मालमत्ता (३० मीटर), हर्मूल गाव १३० मालमत्ता (३६ मीटर), रेणुकामाता कमान ते अहिल्यादेवी होळकर चौक ७० मालमत्ता (३० मीटर), जयभवानीनगर चौक ते १३ वी योजना १५० मालमत्ता (१५ मीटर), आणि औरंगपुरा ते नवाबपुरा ४५० मालमत्ता (३० मीटर) अशा एकूण सुमारे १,०४० बाधित मालमत्ता आहेत.
पावसाळा संपताच रस्ता रुंदीकरणाची प्रत्यक्ष मोहीम पावसाळ्यात निवासी बांधकामांवरील कारवाईला शासनाची बंदी असल्याने सध्या सहा रस्त्यांसाठी कायदेशीर प्रक्रिया, मार्किंग आणि नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार पावसाळा संपताच रस्ता रुंदीकरणाची प्रत्यक्ष मोहीम सुरू करण्यात येईल.- संतोष वाहुळे अतिक्रमण हटाव नियंत्रण अधिकारी