Policeman attacked with knife after refusing to give him a glass of water
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात गुन्हेगारांचे मनोबल इतके उंचावले आहे की, आता पोलिसांवरच हल्ले केले जात आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी मंगळवारी (दि.३) दुपारी टीव्हीसेंटर परिसरात केवळ पाण्याचा ग्लास देण्यास नकार दिला म्हणून दोन सराईत गुंडांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यातील एका अंमलदारावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शहरात गेल्या सात दिवसांत पोलिसाला मारहाण होण्याची ही तिसरी घटना समोर आली आहे.
अक्षय सुरडकर ऊर्फ अक्षय बाँड आणि सागर साळवे ऊर्फ भुऱ्या (दोघे रा. सिद्धार्थनगर) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहितीनुसार, लोहमार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले नीलेश विलास सदभावे (३०) हे ३ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टीव्हीसेंटर भागातील मोना बारच्या समोर एका बिर्याणीच्या गाडीवर उभे होते. यावेळी त्या ठिकाणी अक्षय सुरडकर आणि सागर साळवे हे आले. त्यांनी नीलेश यांच्याकडे पाण्याचा ग्लास मागितला. नीलेश यांनी पाणी देण्यास नकार दिला, याच किरकोळ कारणावरून दोघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
धमकी देऊन आरोपी पसार
नीलेश रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर आरोपींनी आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन घटनास्थळावरून धूम ठोकली. जखमी नीलेश यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आहे तर काय झाले?
भांडण सुरू असताना आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अक्षय, सागर... नका मारू, तो पोलिस आहे, असे नागरिक ओरडून सांगत होते. मात्र सराईत गुन्हेगार भुऱ्याने अधिकच संतापून, पोलिस आहे तर काय झाले, तो आमचा बाप आहे का? त्याला माहित नाही आम्ही कोण आहोत, असे म्हणत खिशातील धारदार चाकू काढला. त्याने नीलेश यांच्या पोटावर, डाव्या बरगडीवर आणि पाठीवर सपासप वार केले.
कायद्याचा धाक उरलाय का?
शहरात एकाच आठवड्यात पोलिसांवर हल्ल्याची ही तिसरी घटना घडल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा संतप्त प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.