छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी ते पैठण या ३९ किलोमीटर अंतरात टाकलेल्या मुख्य २५०० मिमी व्यासाच्या संपूर्ण जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली जाणार होती. तसे निविदेच्या अटी-शर्थीमध्येही नमूद होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने हायड्रोलिक चाचणी न घेता जलवाहिनी फुटली अथवा त्यास गळती लागली तर ते संपूर्ण दुरुस्ती काम कंपनी स्वः खर्चाने करेल, असे हमीपत्र दिले आहे. त्यामुळे ठराविक ठिकाणी घेतलेल्या हायड्रोलिक चाचणीवरच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरवासीयांसाठी केंद्राच्या अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आदे शानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) यांच्यामार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीद्वारे हे काम करण्यात येत आहे.
आतापर्यंत जीव्हीपीआर कंपनीने एमजेपीच्या देखरेखमध्ये मुख्य जलवाहिनी, जॅकवेल, एमबीआर, जलशुद्धीकरण, जलकुंभ, जलकुंभाला जोडणाऱ्या २०००, १५०० आणि ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या, १८०० किलोमीटर अंतराच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, काही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत, तर काही कामे ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात शहरात २०० एमएलडी पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे आता निविदेतील अटी शर्थीप्रमाणे संपूर्ण जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी न घेता ठराविक ठिकाणी घेतलेल्या हायड्रोलिक चाचणीच्या आधावरच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
यावेळी कंपनीने मुख्य जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली नाही तरी चालेल, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कंपनीने जलवाहिनी फुटली किंवा गळती लागली तर त्याची कंत्राटदाराने स्वः खचनि दुरुस्ती करावी, असे हमीपत्र द्यावे. कंपनीने हमीपत्र दिल्यानंतरच जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी टाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जलवाहिनीची आल्ट्रासाऊंड चाचणी पूर्ण
शहरासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान ३९ किमी अंतरावर २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आ-लेली आहे. जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जलवाहिनी टाकताना या जलवाहिनीची आल्ट्रासाऊंड रेडीओलॉजी चाचणी केली आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण केले जात असतानाही आठ ते नऊ किमी अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली आहे.