Imtiaz Jaleel on Pahalgam Attack
छत्रपती संभाजीनगर : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा आज ( दि. २५) नमाज पठन करताना आम्ही काळ्या फिती बांधून केंद्र सरकार आणि भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. दहशतवाद्यांविरोधात ज्या त्या वेळी कठोर कारवाई केली असती तर, हा हल्ला झाला नसता, अशी टीका माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
ते पुढे म्हणाले की, उरी हल्ला झाला त्यावेळेसच कठोर कारवाई करायची गरज होती. त्यावेळेस कठोर कारवाई केली गेली नाही, त्यामुळे पुलवामा हल्ला झाला. त्यावेळेस देखील ठोस कारवाई केली गेली नाही, त्यानंतर आता पुन्हा निष्पापांचे बळी गेलेले आहेत. आता बोलून, बैठका घेऊन फायदा नाही. थेट कारवाई करण्याची गरज आहे, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
ज्यावेळेस नाशिकमध्ये हिंसा घडली होती, त्यावेळी आमचे पक्षाचे नाशिकचे अध्यक्ष हे माझ्या छत्रपती संभाजी नगरच्या कार्यालयामध्ये माझ्यासोबत होते. महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने सांगतो. फक्त मुस्लिम नाव असल्याने पोलिसांनी कारवाई करू नये, सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर लोकेशन तपासून कायदेशीर कारवाई करावी. फक्त मुस्लिम असल्याने कारवाई होत असेल. तर आम्ही नाशिक पोलिसांचा निषेध व्यक्त करतो.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील समस्त मुस्लीम बांधवांना शुक्रवारचे नमाज पठण करताना या हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन केले आहे.