On the occasion of Navratri, Aastha Sanstha interacted with 'those' women
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा, तिरस्कारातून लोक अमावस्येला आमच्या घरावर लिंबू, काळ्या बाहुल्या फेकतात. सकाळी आमचा चेहरा बघणे अशुभ समजतात. आमच्या मुलांनाही प्रेते जाळणाऱ्याची मुले, असे टोमणे मारतात. पण स्मशान हे आमच्यासाठी मंदिर असून, अग्निडाग देणे आमचे कामच असल्याचे मत स्मशानभूमीत अत्यंस्कार करणाऱ्या स्मशानजोगी महिलांनी व्यक्त केले. कोराेना काळात डॉक्टर, नर्स, पोलिस अशा सर्वांच्या कामाचे कौतुक झाले. मात्र कुटुंबीयांनाही हात लावण्याची परवानगी नसणाऱ्या मृतदेहांवर आम्ही अंत्यसंस्कार केले. त्याची कोणीच दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नवरात्रीनिमित्त आस्था जनविकास संस्थेच्यावतीने स्मनाशजोगी महिलांचा सत्कार आणि संवादाचा कार्यक्रम जिद्दीच्या गप्पा परंपरेपलीकडचे आयुष्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सातारा येथील आद्येश्वरी सभागृहात आयोजित कार्यक्रमाला शांताबाई मामडे, अनुसुया पवार, काशाबाई गायकवाड, निर्मला पवार, राधा गायकवाड, रंजना गायकवाड, सुजाता गायकवाड, अनिता गायकवाड या स्मशा नजोगी महिलांसह युवा बहुउद्देशीय मसान जोगी समाज संस्थेचे अध्यक्ष गोविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी आणि वैशाली नांदगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चंद्रकला गायकवाड म्हणाल्या, कोरोना काळात दिवसाला २५ ते ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. रुग्णवाहिकेतून मृतदेहांच्या रांगा लागायच्या. नातेवाइकांना आतमध्ये प्रवेश मुलांपासून सर्वच जण या कामात लागले नव्हता. मृतदेह उचलण्यापासून अग्झिडाग देण्याचे काम आम्हीच केले, मात्र थोडा उशीर झाला तर लोक संतप्त व्हायचे. ओरडायचे, आमच्या घरावर दगडे मारायचे. आमच्या घरातील लहान होते. आमचाही थेट मृत्यूशी सामना होता. मात्र कोरोनायोद्धा म्हणून सर्वांचे कौतुक, सत्कार होत असताना आमचा कोणी विचारही केला नाही. पाच वर्षांनंतर आस्थाने आमच्या कामाची दखल घेतली, यासाठी त्यांनी आभार मानले.
आम्ही दिवाळी, दसरा असे सर्व सण साजरे करतो. मात्र मृत्यू सांगून येत नाही. अनेकदा मुलांचे वाढदिवस, विवाह सोहळे, अगदी जेवायला बसलो असताना मृतदेह येतो आणि आम्हाला काम करावेच लागते. मृतदेहासमोर संपत्तीसाठी भांडणारी कुटुंबे पाहून मनात कालवाकालव होते. वाईट वाटते असे सावित्रीबाई शेळके म्हणाल्या. त्यांनी स्मशानभूमीत राहण्यायोग्य सुविधा तसेच सर्व महिलांना सेवेत कायमस्वरूपी करण्याची मागणी केली.
आमच्या सारख्या कष्टकरी समाजातील प्रत्येकला त्यांच्या पुढील पिढीने या क्षेत्रात येऊ नये, असे वाटते. पण डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनीयरचा इंजिनियर होतो. आमच्या मुलांनी अंत्यविधीचे काम केले तर काय वाईट? पुढील पिढीने हे काम नाही केले तर कोण करेल? असा प्रश्न त्या विचारतात.