Notices will be issued to 8 lakh voters in the district, only 74 percent mapping under SIR
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार मॅपिंगची मुदत रविवारी संपली. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ लाख मतदारांपैकी २४ लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. आता उर्वरित आठ लाख मतदारांना, तुम्ही भारतीय नागरिक आहात का अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जिल्हा प्रशासनाकडून बजावण्यात येणार आहेत. नोटिसानंतर संबंधितांच्या सुनावण्या घेऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत सध्याच्या मतदारयादीतील मतदारांची नावे २००२ च्या मतदारयादीतील नावांशी जुळवून (मॅपिंग) तपासण्यात येत आहेत. या कामसाठी आयोगाने १० मेपर्यंतची मुदत दिली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्याच्या मतदारयादीत ३२ लाख ४४ हजार २५८ नावे आहेत. शेवटच्या मुदतीपर्यंत त्यातील २४ लाख १५ हजार नावांचेच मॅपिंग झाले आहे. हे प्रमाण ७४. ८९ टक्के इतके आहे. आता राहिलेल्या मतदारांना जिल्हा प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
त्यांना तुम्ही भारतीय नागरिक आहात का, तुमचे नाव मतदारयादीत कसे आले याविषयी विचारणा होणार आहे. त्यांना पुराव्यानिशी आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. या मतदारांच्या सुनावण्या घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीत योग्य आढळून आलेली नावे मतदारयादीत कायम राहील.
तर उर्वरित नावे वगळण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार आहे. जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी याआधी संबंधित सर्व मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि सुपरवायझर यांना हे काम निश्चित कालमयदित पुर्ण करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.
स्थलांतरित, मृत मतदारांची नावे वगळणार
मॅपिंगदरम्यान काही मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याचे तसेच काही मतदार मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित मतदारांना स्थलांतरित मतदार व मृत मतदार या वर्गवारीत समाविष्ट करून नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांची बुधवारी बैठक
एसआयआरसंदर्भात सुरुवातीपासून जिल्हा प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना वेळोवेळी माहिती दिली जात असून यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. आता मॅपिंगची मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा हे १३ मे रोजी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मॅपिंगसंदर्भात माहिती दिली जाणार आहे.
जिल्ह्यात ७४. ८९ टक्के मतदारांचे मॅपिंग झाले आहे. आयोगाने मॅपिंगसाठी १० मेपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने आता राहिलेल्या मतदारांना नोटिसा बजावण्यात येतील. त्यांच्या सुनावण्या घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.- सविता चौधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.