Sambhaji Nagar Municipal Election : प्रभागांमुळे वाढणार उमेदवारांची डोकेदुखी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Municipal Election : प्रभागांमुळे वाढणार उमेदवारांची डोकेदुखी

मनपा निवडणूक : ४ वॉर्डाच्या मतदारांना संभाळावे लागणार

पुढारी वृत्तसेवा

Municipal Election : Voters of 4 wards will have to handle

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : शहरात दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. परंतु ही निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, चार वॉर्डाचा एक प्रभाग रा हणार आहे. प्रभाग पद्धत राजकीय पक्षांसाठी लाभदायक असली तरी उमेदवारांना चार वॉडाँतील मतदार संभाळावे लागणार असल्याने मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल १० वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यात यंदा निवडणुका या प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक पक्षातील इच्छुक कामाला लागला आहे. अनेकांनी आपल्या वॉर्डालगतच्या इतर तीन वाँडाँमधील मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

प्रभाग पद्धतीमुळे मिनी विधानसभाप्रमाणेच प्रत्येकाला तयारी करावी लागणार असल्याचेही काही इच्छुकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा आहे. सक्षम असणाऱ्या इच्छुकांनी पक्षांकडून उमेदवारी मिळो अथवा ना मिळो, निवडणुकीत उभे राहायचेच, या दृष्टीकोणातूनच तयारी सुरू केल्याचेही चित्र काही वॉर्डामध्ये दिसत आहे.

दरम्यान, प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक लाभ हा सत्ताधारी आणि विरोध पक्षात असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना होईल, तसेच यात अपक्ष उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, अशीही शक्यता काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

प्रभाग अपक्षांसाठी धोकादायक

प्रभाग पद्धत ही नागरिकांच्या हिताची नाही. प्रत्येक नगरसेवक हा जबाबदारीची लोटालोटी तर करेलच शिवाय काम न करताही मी केले, असे दाखवत श्रेय लाटेल. याशिवाय पैशाच्या जोरावर अपक्षांना व कमकुवत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा सफाया होईल, असे सत्ताधारी पक्षाला वाटते. त्यामुळेच वॉर्डाऐवजी प्रभाग पद्धत केली जात आहे.
- राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

प्रभागमुळे भाजपचाच महापौर

महापालिका निवडणूक ही प्रभाग पद्धतीने करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला, तो योग्य असून, त्याचा लाभ सर्वाधिक हा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील आणि महापौरही आमचाच होईल.
- किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप

प्रभाग मतदारांसाठी फायदेशीर

प्रभाग पद्धतीमुळे एका प्रभागात चार वॉर्डाचा समावेश राहणार आहे. यात चारही वॉर्डातील मतदारांना मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक प्रभागातील मतदारांना चार नगरसेवक उपलब्ध होणार असून, एकाने ऐकले नाही तर मतदार दुसऱ्याकडे तक्रार करू शकतो. त्यामुळे मतदारांसाठीही प्रभाग फायदेशीर राहणार आहे.
राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

घोडेबाजार थांबणार

वॉर्ड पद्धतीत एकच नगरसेवक राहत होता. परंतु प्रभाग पद्धतीमध्ये चार नगरसेवक राहणार असल्याने जबाबदारीची ढकलाढगली होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी प्रभागाचा लाभ राजकीय पक्षांना होणार आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीतील घोडेबाजारही थांबेल.
- अभिजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

एमआयएमला सर्वाधिक लाभ

प्रत्येक राजकीय पक्ष हा महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवण्याची शक्यता आहे. यात इतर पक्षांच्या तुलनेत एमआयएमचा मतदार हा प्रत्येक प्रभागांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे प्रभाग पद्धतीचा लाभ हा एमआयएमलाच सर्वाधिक होईल.
शारेक नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएमआयएम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT