

Youth murdered by gang at Sambhaji Nagar
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : टोळक्याने चाकू अन् वस्तऱ्याने सपासप वार करून एकाचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी (दि.१२) सायंकाळी घडली. यात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर खंडाळा आणि वैजापूर शहरातील दोन गटांत मोठा तणाव निर्माण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
मोईन मुक्तार शहा (२३, रा. खंडाळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी शेख अबरार शेख अरीफ (२४) आणि शोएब असीम पठाण (२३, रा. खंडाळा) यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
खंडाळा गावाबाहेर असलेल्या कृषी कॉलेजजवळ टोळक्याने तीन तरुणांवर अचानक एकसलग सपासप वार केले. यात मोइन याच्या मान, डोके अन् पोटावर व पायावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले. दरम्यान, या घटनेनंतर खंडाळा येथील बसस्थानकावर भरपावसात मोठा जमाव जमा झाला आहे, तर वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बाहेर गर्दी करत रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान, एकाचवेळी दोन ठिकाणी मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे हल्ला करण्याआधी या टोळीची याच परिसरातील एका हॉटेलमध्ये खिचडी शिजली व तेथून बाहेर येत त्यांनी या तीन तरुणांवर चाकूहल्ला केल्याचे समजते. नेमकी मत्याफहॉटेलमध्ये काय षडयंत्र रचल्या गेले व ती हॉटेल कोणती, याविषयी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावे, अशी मागणी होत आहे.
घटनेनंतर खंडाळा आणि वैजापूर शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, गावाला छावणीचे स्वरूप आले.