छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात महावितरणने वीज बिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सुमारे तीन हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चालू महिन्यात खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांनी बिल न भरल्यास त्यांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. या मोहिमेस विरोध केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण व जालना या तिन्ही मंडलांत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक व इतर वर्गवारीतील ४ लाख ३४ हजार ४४० ग्राहकांकडे २८२ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी आहे. ४४ यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १ लाख १७ हजार ७७१ ग्राहकांकडे ६३ कोटी लाख, ग्रामीण मंडलात १ लाख ८२ हजार ५४ ग्राहकांकडे ६९ कोटी ६० लाख तर जालना मंडलातील १ लाख ३४ हजार ६१५ ग्राहकांकडे १४९ कोटी ८३ लाख रुपयांची रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. जानेवारीत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ७७६, ग्रामीण मंडलातील ४९१ व जालना मंडलातील १६११ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
...तर गुन्हे दाखल होणार
संवेदनशील भागांत विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, थकबाकी वसुलीची मोहीम पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.