Minister Prakash Abitkar's inspection visit to Karmad Rural Hospital
करमाड, पुढारी वृत्तसेवा : करमाड ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेला भोंगळ कारभार आणि गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढत्या तक्रारींचा फडशा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या अचानक दौऱ्यात रविवारी (दि.७) उघडकीस आला. करमाड आणि गोलटगाव या दोन्ही ठिकाणी झालेल्या पाहणीदरम्यान मंत्री प्रकाश आबीटकर यांनी गंभीर निष्काळजीपणावर संताप व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
करोडो रुपये खर्चुन उभारलेली आधुनिक इमारत, अत्याधुनिक यंत्रसामग्री असूनही करमाड ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी अनुपस्थितीचे चित्र मंत्री आबीटकर यांच्या पाहणीत समोर आले. ग्रामीण रुग्णांना उपचार न देता थेट संभाजीनगरला जा असे सांगितल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच इतर सरकारी योजनांचे कोणतेही फलक नसल्याचे व कर्मचाऱ्यांना योजनांची अज्ञानता असल्याचेही उघड झाले.
हजेरी नोंदवहीपासून प्रयोगशाळा, औषधसाठा, ऑपरेशन थिएटरपर्यंत पाहणी करताना सर्वत्र गोंधळाचे चित्र दिसत होते. मी चौकशी लावतो, सगळं लगेच सरळ करा, असा कडक इशारा देत आबीटकर यांनी ठोस कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. यानंतर त्यांनी करमाड येथील औषधी भांडाराची पाहणी केली. अपूर्ण कामाबाबत अधिकाऱ्यांनी दिलेली गोलमोल उत्तरे ऐकून त्यांनी नाराजी व्यक्त केली. जानेवारीपर्यंत काम पूर्ण करा; नाहीतर कारवाई अटळ आहे, अशी सक्त ताकीदही दिली.
या संपूर्ण दौऱ्यात आमदार अनुराधा चव्हाण, दत्ताभाऊ उकर्डे, श्रीराम शेळके, भाऊराव मुळे, अशोक उकर्डे, रमेश आघाडे, राहुल पांचाळ, गणेश हुंबे, सुदाम ठोंबरे तसेच शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब भोसले उपस्थित होते. अचानक झालेल्या या तपासणी दौऱ्यानंतर संबंधित आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, आता कडक कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी
रुग्णसेवा कोलमडल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्यमंत्री आबीटकर यांनी सायंकाळी चारच्या सुमारास गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक दिली. ग्रामस्थांनी डॉक्टर सतत गैरहजर राहणे, रात्री वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसणे, तातडी सेवांचा अभाव यांसारख्या गंभीर तक्रारी केल्या.
रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने खाजगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीच कारवाई न झाल्याचे समोर आल्यानंतर मंत्री आबीटकर यांनी संबंधित अधिकारी व येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. सरपंच सचिन लाळे यांनी परिसर मोठा असल्याने येथे शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याची मागणी केली.