Married to a Rajasthani young man for Rs 1.5 lakh; Wife ran away halfway
संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कोरोनो काळात पत्नीचे निधन झालेल्या राजस्थान येथील सलूनचालक तरुणाला दुसरे लग्न करण्याचे आमिष दाखवून शहरातील एका टोळीने गंडा घातला. लग्नासाठी स्थळ असल्याचे सांगून बोलावून घेतले आणि १ लाख ३० हजार घेऊन एका तरुणीशी लग्न लावून दिले. मात्र, राजस्थानला परत जात असताना नवरी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून मध्यरात्री मैत्रिणीसह पसार झाली. ही फसवणुकीची घटना ८ व ९ डिसेंबर रोजी घडली.
नजमा खान आणि तिच्या साथीदार साथीदारांवर वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नजमाला मिटमिटा परिसरातून अटक केली असून तिला न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
फिर्यादी दिलीपकुमार देवरामजी सेन (३०, रा. पिनवाडा, राजस्थान) हे आई-वडील आणि भावासह राहतात. त्यांचे सलूनचे दुकान आहे. कोरोनाकाळात त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने घरच्यांनी त्यांचे दुसरे लग्न करायचे ठरवले होते. दिलीप यांचे भाऊ नरेश मुलगी शोधत असताना त्यांची शहरात फिरोज भाई व सलीम भाई यांच्याशी ओळख झाली. रविवारी (दि. ७) नरेशने त्यांना लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचे सांगितले. त्यांनी मुलगी दाखवतो असे सांगून, नजमा खानसोबत सेन कुटुंबाचे फोनवर बोलणे करून दिले.
नजमाने मुलीचा फोटो पाठवून त्यांना बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे बोलावले. दिलीप, नरेश आणि त्यांची आई त्याच दिवशी राजस्थानहून निघाले आणि सोमवारी शहरात बाबा पेट्रोल पंपाजवळ उतरले. नजमा आणि तिच्या साथीदारांनी त्यांना रेल्वेस्टेशन येथील हॉटेल पंजाबमध्ये नेऊन खोली करून दिली. त्यानंतर टोळी सेन कुटुंबाला एन-१३, वानखेडे नगर, भारत नगर भागातील मुलीच्या घरी घेऊन गेली. तिथे २५ वर्षीय अदिती जगताप नावाच्या तरुणीला बघण्याचा कार्यक्रम झाला आणि दोघांची पसंती झाली. नजमाने अदितीच्या हातात ५०० शगुन म्हणून दिले.
घरातच लावले घाईगडबडीत लग्न
नजमाने मुलीच्या आई-वडिलांशी बोलतो असे सांगून सेन कुटुंबाला हॉटेलवर परत आणले. थोड्यावेळानंतर तिने सेन यांना आपल्याला परत मुलीच्या घरी जायचे आहे, तुम्ही पैसे आणले का?फ असे विचारले. लग्नासाठी म्हणून दिलीप सेन यांनी तिच्याकडे १ लाख ३० हजार दिले. नजमाने मी तुमच्यासोबत मुलीचे लग्न लावून देते असे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी नजमा त्यांना परत मुलीच्या घरी घेऊन गेली आणि तिथे दोघांचे साध्या पद्धतीने लग्न लावून दिले.
राजस्थानला परत जाताना नवरीसह मैत्रिणीची नौटंकी
लग्नानंतर राजस्थानला जाण्यासाठी अदितीसोबत तिची मैत्रीण चंदा हिलाही पाठवण्यात आले. रेल्वे स्टेशनवर जेवण केल्यानंतर नजमा पुन्हा भेटली आणि तिने राहिलेले लग्नाचे पैसे मागितले, पण सेन यांनी आता पैसे नाहीत असे सांगितले. अदिती आणि चंदा यांनी बसने जाण्यास नकार दिल्याने, सर्वजण रेल्वेने निघाले. त्यांनी तिकीट काढण्यासाठी दिलीप यांना सांगितले आणि दोघी बाथरूमला जाऊन येतो असे सांगून गेल्या. त्या परतल्यानंतर रात्री ११ वाजता सर्वजण रेल्वेने मनमाडला पोहोचले.
हॉटेलातून मध्यरात्री पसार
मनमाड स्टेशनवर राजस्थानला जाण्यासाठी तिकीट काढत असताना दोघींनी रात्र खूप झाली असून उद्या जाऊ, राहण्याची सोय करा, असे सांगितले. दिलीप यांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. मध्यरात्री जेवणाची सोय करत असताना, अदिती आणि चंदा या दोघी रात्री १२:३० वाजता हॉटेलमधून पळून गेल्या. त्यांचा शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. नजमाला फोन केला असता, तिचा फोनही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीपकुमार सेन यांनी परत संभाजीनगर गाठले आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.