छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून, मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहे. मात्र कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीआधारे गैरसमज करून आरोप करण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी सोमवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत दिली.
जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आरक्षणाच्या बाबत केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. डॉ. तायडे म्हणाले, ज्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून जरांगे यांच्याविरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नाही. संबंधित दिवशी रविवार असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुटी होती.
शहरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती, मात्र तेथे दुसरा कार्यक्रम असल्याने सभागृह उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझ्या शाळेची जागा एक-दोन तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.
बैठकीतील अनेक जण शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्याने त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती. या संपूर्ण घटनाक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा कुठलाही संबंध येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणासाठी शिंदे सरकारने खूप काम केले
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे जरांगे पाटील अथवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत, हे बोलणे चुकीचे आहे. काही जण वैयक्तिक अथवा राजकीय स्वार्थासाठी चुकीची किंवा अपूर्ण माहिती देत असतील तर जरांगे यांनी त्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यास आम्ही तयार आहोत, असेही डॉ. तायडे यांनी स्पष्ट केले.