Maharashtra Assembly Polls : निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रशासन अलर्ट file photo
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Assembly Polls : निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रशासन अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडबर आले आहे. प्रशासनाने निवडणुकीची तयारी आधीच करून ठेवली होती. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासन सज्ज झाले. आदर्श आचारसंहिता व निवडणूकविषयक माहिती देण्यासाठी बुधवारी राजकीय पक्षांची बैठक बोलाविण्यात आली आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधीकडील शासकीय वाहने जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीनही सज्ज करून ठेवण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक पार पडल्यापासूनच जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला असून पुढील महिन्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आयोगाकडून निवडणुकीच्चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींकडे असलेली शासकीय वाहने जमा करून घेतली जातात. मात्र सध्या जिल्हा परिषद, महापालिका दोन्ही ठिकाणी प्रशासकराज असल्याने लोकप्रतिनीधींकडे फारशी वाहने नाहीत. ज्या काही मोजक्या लोकप्रतिनिधींकडे शासकीय वाहने आहेत, ती जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या, आधीच्या तुलनेत मतदारांची संख्या ८६ हजार २०८ ने वाढून जिल्ह्यातील मतदारसंख्या ३१ लाख ७६ हजार १९७ एवढी झाली आहे. यापैकी ७८ हजार ५७७ नवमतदार आहेत. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या. प्रारूप मतदार यादी जाहीर झाली तेव्हा जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३० लाख ८९ हजार ८८९ होती. त्यात पुरुष १६ लाख १८ हजार ९४, तर महिला मतदारांची संख्या १४ लाख ७१ हजार ६५९ इतकी होती; तसेच इतर १३६ होते. सोमवारच्या (दि. १४) प्राप्त मतदार यादीनुसार मतदार संख्येत वाढ झाली. यानुसार मतदारांची संख्या ८६ हजार ३०८ ने वाढली. या मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या ३१ लाख ७६ हजार १९७ इतकी झाली. यात १६ लाख ५१ हजार ५७६ पुरुष, १५ लाख २४ हजार ४७८ महिला, तर १४३ इतर मतदार आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत, या काळात काय करावे, काय करू नये याविषयी व निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी २ वाजता ही बैठक होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

सिल्लोडमध्ये सर्वाधिक नवमतदार

यावेळी जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या ७८ हजार ५७७ आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १० हजार ८६५ इतके नवमतदार आहेत. कन्नड ७ हजार ४७८. फुलंब्री ८ हजार २२०, छत्रपती संभाजीनगर मध्य ८ हजार ८०२, पश्चिम १० हजार ३८, पूर्व ८ हजार ४३५, पैठण ७ हजार ९५०, गंगापूर ९ हजार ९२ तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात ७ हजार ६९७ नवमतदार आहेत.

७ हजार ईव्हीएम, ४ हजार व्हीव्हीपॅट

मतदानासाठी ७ हजार ईव्हीएम, ४ हजार व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाधवल पेपर ऑडिट ट्रेल) मशीन तयार ठेवल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ३,२६४ मतदान केंद्र असतील. सध्या ३,९२६ कंट्रोल युनीट आणि ७१०९ बॅलेट युनीट याप्रमाणे ईव्हीएम आहेत. तर व्हीव्हीपॅटची संख्याही ४,२५० इतकी आहे. जिल्ह्यात निवडणूक घेण्यासाठी १३ हजार ५६ कर्मचारी लागणार आहेत. त्यावर २५ टक्के राखीव कर्मचारी संख्या विचारात घेतल्यास एकूण १६, ३२० कर्मचारी लागणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

मतदारसंघनिहाय मतदार

संभाजीनगर मध्य ३६६०५७

पश्चिम ४०२८९४

पूर्व ३५२३३८

सिल्लोड ३५५२३०

कन्नड ३३०७४०

फुलंब्री ३६५७५५

पैठण ३२३५००

गंगापूर ३६१२१८

वैजापूर ३१८४६५

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT