पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. १८ व्या फेरीअखेर भुमरे यांनी ३६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोध शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली होती. तसेच इम्तियाज जलील हेही रिंगणात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत झाली.
१८ व्या फेरीअखेर संदीपान भुमरे यांना २,९९,३६६ मते मिळाली आहेत. इम्तियाज जलील यांना २,६३,५६८ मते तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांना १,८८,१२३ मते मिळाली आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. १५ व्या फेरीअखेर त्यांनी 72 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतल्याने कोल्हे यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला असला तरी, हा खरा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच मानला जात आहे.
१४ व्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना ३ लाख ८३ हजार ४५५ मते मिळाली आहेत. तर आढळराव पाटील यांना ३ लाख १८ हजार ४३० मते मिळाली आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार केला होता. तसेच यावेळी बिनकामाचा नको, तर कामाचा माणूस म्हणून आढळराव यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मतदारांनी मात्र अजित पवार यांना धक्का देत पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना कौल दिला आहे.
हेही वाचा :