Loan waiver conditions relaxed for Mahatma Phule beneficiaries
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ मधील महत्त्वाच्या अटी शिथिल करत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभघेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता कमाल २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा असून, पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गावागावांत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
गंगापूर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत बंब यांनी शासनाच्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, यापूर्वी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांपर्यंतच लाभ मिळत होता. शिवाय, थकीत कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा अधिक असल्यास उर्वरित रक्कम स्वतः भरल्याशिवाय लाभ मिळत नव्हता. आता ही अट पूर्णपणे रद्द करण्यात आली असून, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना थेट २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीक कर्ज, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले असल्यास संबंधित शेतकरी पात्र ठरणार आहेत. तसेच पुनर्गठित पीककर्जाचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने मोठा दिलासा दिला आहे. २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२२५ या आर्थिक वर्षांतील पात्र नियमित कर्जदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. यापूर्वी असलेली २०२६-२७ मध्येही नियमित कर्जफेड करण्याची अट शासनाने रद्द केली असून, त्यामुळे अधिक शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार ई-केवायसी, Agristack नोंदणी आणि फार्मर आयडी अनिवार्य असल्याचे आमदार बंब यांनी स्पष्ट केले. आमदार प्रशांत बंब मित्रमंडळ, कार्यमित्र, भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधी गावागावांत विशेष जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करतील, असेही त्यांनी सांगितले.