Leafy vegetable prices remain stable due to increased arrivals at the market committee
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अलीकडील पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनाला चालना मिळाल्याने जाधववाडी येथील घाऊक भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक वाढू लागली आहे. त्याचा परिणाम शहरातील किरकोळ बाजारावरही दिसून येत दिसून येत असून, बहुतांश भाज्यांचे दर स्थिर आहेत. विशेषतः मेथीसह विविध पालेभाज्यांच्या जुड्या १० रुपयांना उपलब्ध असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
बाजार समिती जाधववाडी भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर स्थिर असून, किरकोळ बाजारात ग्राहकांना दिलासा मिळत आहे. शहरातील शहागंज, टीव्हीसेंटर, संभाजीपेठ, मुकुंदवाडीसह प्रमुख किरकोळ बाजारांमध्ये सध्या बटाटे २५ ते ३० रुपये, कांदा ३० ते ३५ रुपये, भोपळा व काकडी ४० रुपये, तर टोमॅटो ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. वांगे, भेंडी, गाजर आणि कोबी यांचे दर ६० रुपये प्रतिकिलो असून, कारले ७० ते ८० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे.
गिलके, दोडके, वाल, हिरवी मिरची, सिमला मिरची आणि दिलपसंद या भाज्यांचे दर ८० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत. दरम्यान, भाजी विक्रेत्यांच्या माहितीनुसार, सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक समाधानकारक असून, पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बहुतांश भाज्यांच्या दरात मोठी चढ-उतार होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले.
पालेभाज्यांचे माफक दर
पावसामुळे पालेभाज्यांचा पुरवठा वाढल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मेथीची जुडी १५ रुपयांना, तर पालक, कोथिंबीर, चुका आणि अन्य पालेभाज्यांच्या जुड्या १० रुपयांना उपलब्ध असून, त्यांची मागणीही वाढली
श्रावण घेवड्याला मागणी
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्रावण घेवडा (बिन्स) १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. शेवग्याचे दर १२० रुपये प्रतिकिलो असून, आले २४० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो, तर लिंबू ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.