

Jayakwadi Dam crosses the 50% mark; stands at 52.74%
पैठण, पुढारी वृत्तसेवा : नाशिकसह गोदावरीच्या उगम परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, या पुराच्या पाण्याचा मोठा फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे. नाशिकच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी धरणातील पाणीसाठ्याने ५० टक्क्यांची पातळी ओलांडत तब्बल ५२.७४% टक्क्यांवर मजल मारली आहे. मागील अवघ्या तीन दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. धरणात पाण्याची आवक २१ हजार ८४१ क्यूसेक सुरू असल्याचे शाखा अभियंता मंगेश शेलार म्हणाले.
पावसाळ्याच्या यावर्षी सुरुवातीला जायकवाडी धरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक होती. धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा न झाल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसमोर पिण्याच्या पाण्यासह शेती आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नाशिक परिसरात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे.
सध्याची पाणी पातळी १५११.७८ फूट, जिवंत पाणीसाठा १११६.८१४ दलघमी, एकूण पाणीसाठा १८५४.९२० दलघमी, जिवंत पाणीसाठा २१७०.९३५ दलघमी. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७९.८९% टक्के होता.
यंदा धरणाने ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, जलसाठ्यात झालेली ही वाढ मराठवाड्यासाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. धरणात सुरू असलेली पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास आगामी काळात जायकवाडीचा जलसाठा आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील तीन दिवसांपासून जायकवाडी धरणात ४३७दलघमी पाणी आले आहे. पुढील दोन वर्षे पिण्यासह औद्योगिकीकरणाच्या संपूर्ण मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दि. २४ रोजी ३२ टक्के होता, तर तीन दिवसांत पाणीसाठा आता ५२.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे.