Land acquisition payments worth ₹40 crore for various projects are pending
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पाझर तलाव, कालवे यासह इतर प्रकल्पांसाठी झालेल्या भूसंपादनातील ८१ प्रस्तावांमध्ये अजूनही मोबदला मिळालेला नाही. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मोबदलाधारक भूसंपादन विभागाच्या खेट्या मारत आहेत. दरवर्षी यात शासनाकडून ७ते ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होते. यंदा वाढीव मागणीचेच ६ कोटी रुपये उपलब्ध झाले असून, अजूनही ४० कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील जायकवाडीसह नांदूर मधमेश्वर यासह जिल्हा परिषद, मृदा व जलसंधारण आणि इतर लघु प्रकल्पांसाठी मागील अनेक वर्षांपूर्वी भूसंदपादन प्रक्रिया राबविण्यात आली होती. यातील काही प्रकल्पांतील मोबदल्याबाबतचे दावे न्याय प्रवृष्ट आहेत. तर काहींमध्ये न्यायालयाने निर्णय देत मोबदला अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु, असे असतानाही या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव मोबदला शासनाकडून उपलब्ध होत नसल्याने मोबदला अदा करण्यात आलेला नाही. सध्यास्थितीत जिल्हा भूसंपादन विभागाकडे विविध प्रकल्पांचे ८१ प्रस्ताव मोबदल्यासाठी पडून आहेत. त्या मोबदल्यासाठी भूसंपादन विभागाला ४० कोटींचा निधी आवश्यक आहे.
प्रत्यक्षात दरवर्षी शासनाकडून या मोबदल्यासाठी तुटपुंजा निधीच भूसंपादन विभागाला उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मोबदल्याची रक्कम अदा केली जात आहे. गेल्या महिन्यातच १५ प्रस्तावांतील वाढीव भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी ७ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला होता, तो अदादेखील करण्यात आला. यात १० आर पासून ते ४ ते ५ हेक्टरपर्यंतच्या जागेच्या मोबदल्या समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गतवर्षी मिळाले २६ कोटी
जिल्हा भूसंपादन विभागाला नियमित भूसंपादनासाठी गतवर्षी २०२४-२५ सालचा २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. हा निधी संबंधित मोबदलाधारकांना वाटप करण्यात आला. यंदा प्रलंबित मोबदल्यासाठी शासनाकडे १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. परंतु, अद्याप निधीच उपलब्ध झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.