छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल लागताच शहरातील भाजीपाला बाजारात हंगामी भाज्यांची रेलचेल सुरू झाली आहे. यंदा प्रथमच कंटुले आणि मुळा बाजारात दाखल झाला असून, कंटुल्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे कंटुल्यांचा दर प्रतिकिलो ३५० रुपयांवर पोहोचला असून, सध्या ते बाजारातील सर्वाधिक भाव खाणारी भाजी ठरली आहे. तर मुळा प्रतिनग १० रुपयांना विकला जात आहे.
शहरातील प्रमुख भाजी मंडईंमध्ये रविवारी (दि.१२) भाजीपाल्याची आवक समाधानकारक होती. यात बटाटा प्रतिकिलो ३० रुपये, कांदा ३० ते ४० रुपये, भोपळा ४० रुपये, काकडी ५० रुपये, टोमॅटो ५० ते ६० रुपये, वांगे ६० रुपये, तर कारले आणि भेंडी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होती.
गाजरालाही ६० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. मात्र श्रावण महिन्यात उपवास आणि पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या भाज्यांची मागणी वाढत असल्याने कंटुले आणि श्रावण घेवड्याच्या दरात तेजी आली आहे. श्रावण घेवडा प्रतिकिलो ३०० रुपयांनी विकला जात असून, ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आवक वाढल्यानंतर दरात काहीशी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोबी, वाल, गिलके, दोडके, हिरवी मिरची, सिमला मिरची,दिलपसंद आणि गावरान कैरी यांना प्रतिकिलो ८० रुपयांचा भाव मिळत आहे.
शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये, लिंबू ६० ते ८० रुपये, अद्रक २४० ते २५० रुपये, तर लसूण २०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढू लागली असून, आगामी काळात हंगामी भाज्यांची आवक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.