Joint of the 2,500 mm water pipeline dislodged
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला येत्या दोन महिन्यांत २०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान जलवाहिनीतून युद्धपातळीवर पाणी उपसा चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेत शनिवारी (दि. २८) अचानक कारकीनजवळ जलवाहिनीच्या जॉइंटचे वेल्डिग निखळले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा हदरली असून तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे.
शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या देखरेखीत कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी करीत आहे. जलकुंभ वगळता या योजनेतील मुख्य कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या दोन महिन्यांत योजनेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. यात शहरवासीयांना वाढीव २०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे काम पूर्ण करण्यात आले. जॅकवेलवर ३७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आले. त्यानंतर जॅकवेलमध्ये दोन दिवस पाणी साठवून ठेवण्यात आले.
पाण्याची गळती नसल्याने लागती तिसऱ्या दिवशी जॅकवेलवरील ३७०० अश्वशक्तीचे एक एक करून दोन्ही पंप सुरू करून उपसा चाचणी घेण्यात आली. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रविवारपासून जलवाहिनीतून टप्प्या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या जॉइंटचे अशा प्रकारे वेल्डिंग निखळले आहे.
टप्प्याने पाणी सोडले जात आहे. पहिल्या दिवशी ५ किलोमीटर यशस्वी चाचणी झाली. त्यानंतर ८ किलोमीटर, १२ किलो मीटर आणि शुक्रवारी १४.६० किलोमीटरपर्यंत पाण्याची चाचणी घेण्यात आली. यादरम्यान कारकीन परिसरात मुख्य जलवाहिनीच्या जॉइंटचे वेल्डिग निखळल्याचे अढळले. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती सुरू होती. त्यामुळे तातडीने पाणीपुरवठा बंद करून वेल्डिगच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
हायड्रोलिक चाचणीला बगल
मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून शहरात पाणी आणले जाणार आहे. यामुळे संपूर्ण जलवाहिनीची अल्ट्रासाऊंडऐवजी विशेष दाब देत हायड्रोलिक चाचणी करणे आवश्यक होते. परंतु, सतत काम वेगाने पूर्ण करण्याचा तगादा सुरूच ठेवण्यात आला. त्यामुळे संपूर्ण जलवाहिनीऐवजी ठरावीक ठिकाणीच हायड्रोलिक चाचणी घेण्यात आली. आता वेल्डिंग निखळल्याने अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच जॉइंटचे वेल्डिग निखळल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन दिवस चाचणी बंद
सध्या जॅकवेलमधून मुख्य जलवाहिनीमध्ये पाणी घेऊन गळतीची चाचणी घेतली जात आहे. यादरम्यान वेल्डिग योग्यरीत्या न झाल्याचे आढळले आहे. दुरुस्तीचे काम सुरू केल्याने दोन दिवस चाचणी घेता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.