वैजापूर : रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र मुस्लिम समाज त्यांना अटक करण्याच्या मागणीवर ठाम आहे. याप्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले असून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथून 'चलो मुंबई तिरंगा रॅली' रविवारपासून सुरू केली आहे. याबाबत बोलताना मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून जलील हे राजकरण करू पाहत आहेत. त्यांचा मोर्चा म्हणजे राजकरण आहे, असा आरोप रामगिरी महाराज यांनी आज (दि.२३) एका वृतवाहिनीशी बोलताना केला. तसेच जलील यांनी विचाराची लढाई विचारानेच लढावी, असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथे गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह होता. या सप्ताह दरम्यान सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचे पडसाद राज्यभरात उमटले होते. या संदर्भात राज्यात रामगिरी महाराजांवरती जवळपास साठपेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून रामगिरी महाराजांना अटक करावी, या भूमिकेवर मुस्लिम बांधव ठाम आहे. यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले.
रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मा. खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी (दि.२२) छत्रपती संभाजीनगर येथून 'चलो मुंबई तिरंगा रॅली' काल सुरू केली आहे. या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दाखल झाले. याबाबत बोलताना महंत रामगिरी महाराजांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. तसेच इम्तियाज जलील हे राजकारण करू पाहत आहेत. त्याचा मोर्चा म्हणजे राजकारण आहे. जे इतिहासात आहे तेच मी सांगितले असून विचारांची लढाई विचाराने लढावी, असं रस्त्यावर उतरणे आरजकता निर्माण करणे चुकीचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.