Heavy rain overnight in the city and surrounding areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून धुवांधार पाऊस सुरू असून, रविवारी (दि.२१) दिवसभर उघडिप दिलेल्या पावसाने शहरासह परिसराला रात्रभर चांगलेच झोडपले. यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. तर पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यामध्ये झाड उमळून पडले. मनीषा कॉलनी, कला लक्ष्मी अपार्टमेंट, संत एकनाथ रंगमंदिर परिसरातील रिकाम्या प्लॉटवर पाणी साचले होते. या पावसामुळे जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सात व सिल्लोडमधील दोन अशा ९ सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
शहरासह परिसरात सर्वच भागांत रविवारी रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केली. या पावसामुळे काही भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. तसेच सखल भागांत तळी निर्माण झाली. दरम्यान, जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. उभे पीक आडवे पडल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले.
त्यामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असून, शेतकरी हवालदिल झाले. सलग आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीसह घरांची पडझड व पशुधनाचे मोठ्याप्रमाणावर नुकसानही झाले. काही जण नदीच्या पुरात वाहून गेले. दरम्यान, याचे पंचनामे कधी होतील आणि कधी नुकसान भरपाई मिळेल, या प्रतीक्षेत असतानाच रविवारी पुन्हा एकदा वरुणराजा संभाजीनगर जिल्ह्यात धो धो बरसला.
रात्रीतून जिल्हाभरात ३१. ६ मिमी तर शहरात ९.२ पावसाची नोंद झाली आहे. यात सिल्लोडसह पैठण तालुक्यालाही पावसाने धुवून काढले असून, याचा सर्वाधिक फटका पैठणला बसला. पैठण तालुक्यातील तब्बल ७, तर सिल्लोडमधील २ अशा ९ सर्कलमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आधीच संकटात असलेला बळीराजा यामुळे आणखी अडचणीत आला आहे. लवकरात लवकर पंचनामे व्हावे तसेच नुकसान भरपाई पदरात पडावी, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून होत आहे.