खुलताबाद : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील जगप्रसिद्ध 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर श्रीक्षेत्र वेरूळ येथे प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होणारा महाशिवरात्र यात्रा महोत्सव सुरळीत पार पडावा आणि येणाऱ्या भाविकांची कुठल्याच प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरातील गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंद केला आहे, असा निर्णय श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक विनय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
वेरूळ येथील महाशिवरात्र यात्रेस रविवार (दि.15) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त देश-विदेशांतील भविकांसह दूरदूर वरून येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे. तसेच भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहासात प्रथमच भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त गाभऱ्यात दर्शन बंद करण्यात आले असून, भाविकांना बाहेरूनच दर्शन घावे लागणार आहे.
यात्रा काळात वेरूळ परिसरातील ग््राामस्थांना सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत ओळखपत्र दाखवून थेट मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करता येणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली. यात्रेदरम्यान महामार्गावर लावण्यात येणारी विविध दुकाने 5 ते 10 फूट मागे घेणे, रस्त्यावर कोणीही दुकान लावणार नाही याची काळजी ग््राामपंचायत वेरूळ यांनी घ्यावी, भोसले चौक त वृंदावन हॉटेलपर्यंत कुणालाही पार्किंगसाठी परवानगी देण्यात येऊ नये.
या आढावा बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक विनय राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, मुख्याधिकारी समीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, सरपंच प्रकाश मिसाळ, पोलिस पाटील रमेश ढिवरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी व मंदिर समितीचे सदस्य, भारतीय पुरातत्व विभाग, महसूल विभाग, वन विभाग, अग्निशमन दल, वेरूळ ग््राामपंचायत यासंबंधी बैठकीत चर्चा होऊन संपूर्ण यात्रेचे नियोजन करण्यात आले.
मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा नेण्यास बंदी
सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा आदी नेण्यास बंदी घातली आहे. त्याचे काटेकोर पालन करावे. तसेच भविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांना सुलभतेने दर्शन घेता यावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. पार्किंग व्यवस्था, फिरते स्वच्छता गृह, परिसराची स्वच्छता आदी करण्यात यावी. प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन महामंडळाने जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे. वेरुळातील शिवालय तीर्थकुंडाची स्वच्छता करण्यात यावी, तीर्थकुंडाच्या पाण्यात बुडल्याच्या घटना घडू नयेत म्हणून कुंडात लाईफगार्ड तैनात करण्यात यावेत. तसेच कुंड ते पर्यटन अभ्यागत केंद्रालागत रस्त्याच्या मधोमध बॅरिकेट्स लावण्यात येणार असल्याचे पूर्व तयारी बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले.