सुरक्षेच्या नावाखाली गोदावरी महामंडळाची लाखोंची उधळपट्टी! pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : सुरक्षेच्या नावाखाली गोदावरी महामंडळाची लाखोंची उधळपट्टी!

पाणी व जमिनीच्या प्रश्नांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनाच या सुरक्षारक्षकांकडून गेटवर रोखले जात असल्याने प्रशासनाविरोधात संताप

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गोदावरी पाटबंधारे कार्यालयात सुरक्षेच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या कराच्या पैशातून हा प्रकार होत असल्याची चर्चा आहे. सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या या सुरक्षारक्षकांवर दरमहा लाखोंचा खर्च केला जातो. याउलट पाणी व जमिनीच्या प्रश्नांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनाच या सुरक्षारक्षकांकडून गेटवर रोखले जात असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालय, कडा ऑफिससह संबंधित सर्व कार्यालयांच्या परिसरात 30 पेक्षा अधिक सुरक्षारक्षक तैनात असून, त्यांच्या पगारावर दरमहा सुमारे 7 लाखांच्या आसपास खर्च होत असल्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या नावाखाली उभी केलेली ही यंत्रणा प्रत्यक्षात जनतेलाच दूर ठेवण्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप होत आहे.

विशेषत: याबाबत तक्रारींसाठी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे जाऊन सुरक्षारक्षकांकडून वरिष्ठांच्या सूचनांनुसार नागरिकांना प्रवेश नाकारला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यामध्ये विशेष म्हणजे, नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका सुरक्षारक्षकाने सांगितले की, कोणीही आले तर आधीच काम विचारायचे, पाणी किंवा जमिनीचा प्रश्न असेल तर बाहेरूनच परत पाठवायचे, असे आदेश आहेत. आम्ही फक्त आदेशांचे पालन करतो, नाही तर वरिष्ठांकडून कारवाई होते.

एकूणच, गोदावरी पाटबंधारे कार्यालयातील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकारावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, जनतेच्या पैशातून उभी राहिलेली ही यंत्रणा जनतेलाच दारात अडवत असेल तर सर्वसामांन्याचा वाली कोण? हा प्रश्न अनुउत्तरित आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक; कार्यकर्त्यांना मात्र सूट

नुकत्याच पार पडलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांना गेटवरच अडवण्यात आले. पोलिस व खासगी सुरक्षारक्षकांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारी समोर आल्या. याउलट, पक्षाचे चिन्ह शर्टावर लावलेल्या कार्यकर्त्यांची मात्र मोकळी ये-जा सुरू होती.

कार्यालयात जमीन मोबदला प्रकरणांसह इतर निवेदने देण्यासाठी अनेक शेतकरी येतात. त्यांना आत जाऊ दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही जातो; मात्र आम्हालाही प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे शासकीय कार्यालयात खासगी सुरक्षा यंत्रणा कशासाठी हवी, असा प्रश्न निर्माण होतो.
सुरेश वाकडे, प्रदेश सचिव, बुलंद छावा मराठा युवा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT