Godavari Flood : वैजापूर तालुक्यात गोदाकाठ रात्रभर जागा !  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Godavari Flood : वैजापूर तालुक्यात गोदाकाठ रात्रभर जागा !

अतिवृष्टीनंतर महापुराच्या महासंकटाची होती भीती, प्रशासनाकडून सतर्कच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Godavari faced severe flood situation after 90 thousand cusecs of water was released into Godavari

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा: वैजापूर तालुक्यात रविवारी अतिवृष्टीमुळे सर्वच मंडळांत आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच सायंकाळी पुन्हा गोदावरीला महापूर आल्याने प्रशासनासह नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. तब्बल ९० हजार क्यूसेक पाणी गोदावरीत्त सोडल्यानंतर गोदावरीला भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे महापुराच्या भीतीने रात्रभर गोदाकाठ जागा राहिला होता.

भयभीत झालेल्या नागरिकांचे रात्रभर स्थलांतर सुरू होते. यावेळी वांजरगाव, सरला बेटमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांना शाळेच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले. तसेच गोदावरी नदीवरील सहा पुलांपैकी तब्बल पाच पूल पाण्यात गेल्याने रविवारी रात्री अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी प्रशासन रात्रभर गावागावांत जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करताना दिसले.

गोदावरीला महापूर आल्याने तहसीलदार सुनील सावंत आणि महसूलचे अधिकारी-कर्मचारी सरला बेट, शिंदे वस्ती व वांजरगावमध्ये तळ ठोकून आहेत. गोदावरी नदीत रविवारी सकाळी ७२७१७ क्युसेकने विसर्ग सुरू होता. मात्र पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दुपारी हा विसर्ग ७८२७६ इतका झाला होता, तर दुपारून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सायंकाळी तो ९०,८४८ क्युसेक इतका झाला होता. त्यामुळे पाण्याचा प्रवाह नदीपात्र ओसंडून वाहू लागला. त्यामुळे वांजरगाव गोवर्धन पूल, बाजारठाण टाकळी बंधारा, अव्वलगाव श्रीरामपूर, डॉणगाव पुलतंबा व वाजरंगाव सरला बेट असे पाच पूल पाण्याखाली गेल्याने या मर्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिसरात पाऊस थांबलेला आहे, परंतु नाशिक, नांदूर मधमेश्वर धरणातून सोमवारी पाणी विसर्ग सुरूच आहे.

गोदावरी नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका सराला बेट जवळ असलेल्या शिंदे वस्तीला बसत आहे. शिंदे वस्तीवर अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. सोबतच पाळीच जनावरेसुद्धा आहेत. सोमवारी तहसीलदार सुनील सावंत यांनी त्यांना सुरक्षितस्थळी रवाना होण्याची विनंती केली, मात्र सध्या वस्तीवरील नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने त्यांनी वस्तीवरच थांबण्याची भूमिका घेतली आहे.

पुराच्या तडाख्यात होत्याचे नव्हते झाले

वैजापूर तालुक्यातील काही गावे तसेच गोदा काठावरील गावे न भूतो.... अशा पूरस्थितीचा सामना मागील दोन दिवसांपासून करत आहे. गोदावरीला तब्बल ९० हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग तसेच काही गावांत पुरात अडकलेल्या नागरिकांची महसूल, पोलिस, एनडीआरएफ अशा विविध यंत्रणांच्या मदतीने सुटका करण्यात येत आहे. काही ठिकाणी पुराच्या तडाख्यात नागरिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. हजारो हेक्टर शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, बेघर झालेल्यांची संख्या मोठी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT