Gangakhed : Anger among the citizens due to frequent power outages during the day
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाची धामधूम, महालक्ष्मीचा सण आणि घराघरांत धार्मिक वातावरण असताना शहरासह ग्रामीण भागाला मात्र महावितरणच्या भोंगळ नियोजनामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. दिवसातून वारंवार वीज खंडित होण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांत संताप आहे. सणासुदीच्या काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याने नियोजन नेमके कुठे आहे? असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित होत आहे.
वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तक्रार केली की, कधी तांत्रिक बिघाड तर कधी दुरुस्तीचे कारण सांगितले जाते. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी कारणे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याची नागरिकांची भावना आहे. सणासुदीच्या काळात वीजपुरवठ्याचे विशेष नियोजन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात लपंडाव सुरू असल्याने महावितरणचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
महालक्ष्मी सणानिमित्त अनेक घरांत देवीला सोन्या-चांदीचे दागिने घालण्याची परंपरा आहे. अशा संवेदनशील काळात रात्रीला वारंवार वीज खंडित होत असल्याने घरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांच्या हालचाली वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
ग्रामीण भागात यापूर्वीच लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यातच रात्री वीज गायब राहिल्यास चोरट्यांना मोकळे रान मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच महावितरण जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा अत्यंत तत्परतेने ग्राहकांच्या दारात पोहोचते. मात्र, ग्राहकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची वेळ आली की तांत्रिक बिघाडांची कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.
वसुली करताना तत्परता; सेवा देताना जाते कुठे ?
वसुली करताना तत्परता दाखवता, मग सेवा देताना हीच तत्परता कुठे जाते? असा सवाल वीजग्राहकांनी केला. सणासुदीच्या काळात शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, रात्रीला अनावश्यक वीजखंडित होण्याचे प्रकार थांबवावे व वारंवार बिघाड होणाऱ्या यंत्रणेची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.