Former Market Committee Chairman Pathade's resignation letter to BJP
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकिसन पठाडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर थेट शिंदेसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला वैतागून पक्षातून बाहेर पडल्याची खदखद त्यांनी बुधवारी (दि.२१) राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे. राजीनाम्यानंतर पठाडे यांनी शिवसेने (शिंदे गट) कडून लाडसावंगी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
बाजार समितीचे दोनवेळा सभापतीपद भूषवलेल्या राधाकिसन पठाडे यांनी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्याकडे सादर केलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तसेच आताच्या जिल्हा परिषदेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र मला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप पठाडे यांनी केला आहे.
तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद असूनही स्थानिक नेतृत्वाने संधी नाकारल्याने पक्षात राहणे अशक्य झाल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांनी याच नाराजीतून सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. पठाडेंच्या या निर्णयामुळे भाजपमधील अस्वस्थता उघड झाली असून, बाजार समितीतील राजकारणावर यांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
दरम्यान, पठाडे यांनी आता शिंदेसेनेत प्रवेश करून करमाडमधील लाडसांवगी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करमाड हे फुलंब्री तालुक्यातील मोठे सर्कल मानले जाते. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून आगामी काळात फुलंब्रीतील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे मानले जात आहे.
पुढील काही दिवसांत फुलंब्री तालुक्यात राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार असल्याने कार्यकर्त्यांत याबाबत चर्चा होत आहे. राज्यपाल बागडेंचे निकटवर्तीय पठाडेंच्या राजीनाम्याने खळबळ राधाकिसन पठाडे हे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या पाठबळामुळेच पठाडेंना दोन वेळा बाजार समिती सभापतीपदाची संधी मिळाली होती.
गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी लाडसावंगी गटातून तयारी सुरू केली होती. तसेच दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी बाजार समिती सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र ऐनवेळी भाजपकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी टोकाला गेल्याने त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे फुलंब्री तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.