गंगापूर तालुक्यात पूरस्थिती, गोदावरी, शिवना नद्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur Heavy Rain : गंगापूर तालुक्यात पूरस्थिती, गोदावरी, शिवना नद्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर

वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Flood situation in Gangapur taluka, citizens displaced due to floods in Godavari, Shivana rivers

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गंगापुर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवना, गोदावरीसह इतर नद्यांना पूर आला असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने वेळीच हस्तक्षेप करत शेकडो नागरिकांचे रेस्क्यू व स्थलांतर केले असून, वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

गंगापूर तालुक्यामध्ये गोदावरी व शिवना नदी दुथडी वरून वाहत असल्याने दोन्ही नद्यांना महापूर आला आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठी असलेल्या अमंळनेर येथे सकाळीच १२ नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवले. शिवना नदीकाठी असलेल्या मालुंजा गावात शिवना नदीला मोठा पूर आल्याने गंगापुर लासुर स्टेशन मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. पुलावर सुमारे १० फूट पाणी वाहत आहे. याच ठिकाणी २ शेतकऱ्यांनी झाडावर चढून महसूल प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवला व तात्काळ पंचनाम्याची मागणी केली.

रेस्क्यू टीमने त्यांना सुखरूप खाली उतरवले. नरसापूर येथे पत्र्याच्या शेडमध्ये अडकलेला एक व्यक्ती, आणि पेंडापूर येथे शेतात अडकलेले ६ नागरिक यांनाही सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. काटेपिंपळगाव येथे शिवना नदीच्या पुरामुळे अडकलेले २-३ कुटुंबीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने हलवले. दहेगाव बंगला येथील नाल्याच्या प्रवाहात एक बैलगाडी वाहून गेली, मात्र अद्याप ओळख पटलेली नाही. आंबेलोहळ येथे नदीचे पाणी गावात शिरले होते. काही काळासाठी परिस्थिती गंभीर होती, पण आता नियंत्रणात आहे.

मालुंजा येथील नीता देविदास झोजे यांचे घर कोसळले असून आर्थिक नुकसान झाले आहे. बोलेगाव येथील उत्तम गायकवाड यांच्या घरात पाणी शिरले. वडाळी येथे मुसळधार पावसामुळे घरातील साहित्य वाहून गेले. अमळनेर वस्ती परिसरात गोदा वरी नदीची पातळी वाढल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. परिस्थितीचा वेळीच अंदाज घेऊन ५ आदिवासी कुटुंबांतील २२ सदस्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.

ही कारवाई गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व त्यांच्या टीमने संयुक्तपणे केली. त्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवास, अन्न, पाणी व अन्य आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व स्थलांतरित कुटुंबे सुरक्षित आहेत आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तहसीलदार नवनाथ वागवाड यांनी नागरिकांना नदीकाठावर जाणे टाळण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT