Five lakh graduate seats vacant across the state
सुनील कच्छवे, छत्रपती संभाजीनगर राज्यात मागील पाच वर्षांत पदवीचे शिक्षण देणारी महाविद्यालये गावोगावी सुरू झाली. परंतु आता विद्यार्थ्यांअभावी यातील अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सद्यस्थितीत राज्यभरात कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आदी पदवी अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमता १३ लाख ७९ हजार इतकी आहे. मात्र यंदा या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून केवळ ८ लाख ८० हजार इतकेच प्रवेश झाले आहेत. परिणामी, तब्बल ४ लाख ९९ हजार जागा रिक्त आहेत.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात शासकीय महाविद्यालयांची संख्या पूर्वीइतकीच आहे, परंतु शासन अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या सातत्याने वाढते आहे.
उच्च शिक्षण सर्वांना सहज उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने शासनाकडून अशा महाविद्यालयांना परवानग्या दिल्या जात आहेत. परिणामी, राज्यात उच्च शिक्षण देणार्या महाविद्यालयांची संख्या २०१९-२० च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये तेराशेने वाढली आहे.
तसेच राज्यभरातील महाविद्यालयांची प्रवेश क्षमताही ३ लाख विद्याथ्यर्थ्यांनी वाढली आहे. मात्र आता अपेक्षित प्रमाणात प्रवेश होत नसल्याने बहुसंख्य महाविद्यालये ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, सन २०२४-२५ मध्ये डीएडसह कला, वाणिज्य, विज्ञान, नॉन एआयसीटीई अभ्यासक्रम, विधी आदी पदवी अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमता ही १३ लाख ७९ हजार ६८७ इतकी होती. त्या तुलनेत ६३ टक्केच प्रवेश झाले.
वा प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ही ८ लाख ८० हजार ३१५ इतकी आहे. म्हणजेच ४ लाख ९९ हजार ३७२ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त जागा या कला शाखेच्या आहेत. या रिक्त जागांची संख्या ही १ लाख ८० हजार इतकी आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेच्याही सुमारे दीड लाख जागा रिक्त आहेत.