छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सन 2025 मध्ये तब्बल 1129 शेतकर्यांनी आपले जीवन संपवले. शेतकरी जीवन संपवण्याचे हे सत्र नव्या वर्षातही सुरूच आहे. जानेवारी 2026 या एका महिन्यात विभागात तब्बल 76 शेतकर्यांनी जीवन संपवले आहे. यात सर्वाधिक 24 जण बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 20 शेतकर्यांनी आपले जीवन संपविले आहे.
मराठवाड्यातील बहुतेक शेती ही कोरडवाहू स्वरुपाची आहे. मागील काही वर्षांत कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊन त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाय पिकविलेल्या शेतीमालाला हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यानेही शेतकरी अडचणीत आला आहे.
परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवित आहेत. सन 2025 मध्ये म्हणजे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान मराठवाड्यातील 1129 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यानंतर 2026 मध्येही शेतकरी जीवन संपवण्याचे सत्र थांबलेले नाही.
जानेवारी महिन्यात आणखी 76 शेतकर्यांनी जीवन संपवले आहे. शेतकरी जीवन संपवण्याच्या प्रकरणात जीवन संपवणा-या शेतकऱ्याच्या वारसांना शासनाकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.