छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेसमोर एक मोठे तांत्रिक संकट उभे राहिले आहे. पाणीसाठा कमी झाल्याने सायफन यंत्रणेद्वारे जॅकवेलमध्ये पाणी पोहोचविण्याच्या प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत. पाईपलाईनमध्ये हवा साचून बुडबुडे निर्माण होत असल्याने विद्युत पंपांना आवश्यक दाब मिळत नाही. परिणामी, नक्षत्रवाडी जलश-द्धीकरण केंद्राकडे जाणारा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.
अमृत-२ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहरासाठी अतिरिक्त २०० एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. यातूनच १२ जूनपासून शहराला ५० एमएलडी वाढीव पाणी देण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे या नियोजनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जूनचा पहिला आठवडा संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलस्रोतांवरील ताण वाढला आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास प्रशासनासह शहरवासीयांच्या चिंतेत मोठी भर पडणार आहे. पुढील पाणीपुरवठ्याचे नियोजन आता पावसाच्या आगमनावरच अवलंबून असणार आहे.
काय आहेत उपाययोजना ?
ही अडचण दूर करण्यासाठी पाणी अधिक खोल पातळीवरून खेचता यावे, म्हणून पाईपची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच मान्सून आणखी लांबल्यास सायफन प्रणालीवर अवलंबून राहणे कठीण ठरेल, त्यामुळे दीर्घकालीन उपाय म्हणून धरणात फ्लोटिंग पंप बसविण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.