Sambhajinagar News : शहर पाणीपुरवठ्याचे तीनतेरा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शहर पाणीपुरवठ्याचे तीनतेरा

जलवाहिनी दुरुस्तीनंतरही पुरवठा विस्कळीतच; नागरिकांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

Even after water pipeline repair, supply in the city remains disrupted; Citizen inconvenience

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले असून, वेळापत्रक कोलमडल्याने शहरात अनेक भागांत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यातच शनिवारी रात्री फुटलेल्या सातशे आणि नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची दुरुस्तीनंतरही शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याने अनेक भागांतील टप्पे अद्यापही सुरळीत झालेले नाही. त्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १०० आणि ५६ दललि क्षमतेच्या योजना जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेच्या जलवाहिन्या वारंवार फुटत आहे. शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, शहराचा पाणीपुरवठा अद्यापपर्यंत सुरळीत झालेला नाही. शनिवारी ढोरकीन पंपगृहाजवळ सातशेची जलवाहिनी फुटली. त्यापाठोपाठ चितेगाव येथे रात्री सातशेची जलवाहिनी फुटली तर नऊशेच्या जलवाहिनीचे दोन पाईप निखळल्याने पाणीपुरवठा बंद झाला.

मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी रविवारी पाणीपुरवठा बंद न ठेवता दिवसभर दुरुस्ती काम पूर्ण केले. त्यानंतर ढोरकीनजवळील सातशेची जलवाहिनी बदलण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असले तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

तसेच शहराला पाणीपुरवठा करणारी बाराशे मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तर फारोळा येथून सातशे आणि नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनीही सुरू असल्याने शहरात पाणी व्यवस्थित सुरू असूनही पाण्याचा गॅप कमी झालेला नाही. सध्या आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जलवाहिनी फुटताच पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे नित्याचेच झाले आहे. पाण्याचे टप्पे सुरळीत होण्यास आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार आहे.

तीन दिवसांचा ब्रेक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला फारोळा येथील जोडणी व पंपगृहातील कामांसह पंपिंगची कामे करण्यासाठी तीन दिवसाचा खंडकाळ (वेळ) देण्यात आला आहे. ही कामे दोन दिवसांपासून सुरू असून, आज रात्रीपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या भागांनाही फटका

विश्वभारती कॉलनीच्या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याशिवाय चिकलठाणा, मुकुंदवाडी, संजयनगर, राजनगर, विद्यापीठ, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, भीमनगर, भावसिंगपुरा या भागाचाही पाणीपुरवठा विस्कळीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT