Due to the delay in the Panchnamas, the proposal for help was stalled
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल १२ लाख ८१ हजार ६९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, आतापर्यंत यातीत ८ लाख २३ हजार २३६ हेक्टरवरील नुकसानीचेच पंचनामे पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. पंचनाम्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने शासनाकडे निधीची मागणी होऊ शकलेली नाही.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यात मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला, शेकडो महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे नांदेडसह, बीड, लातूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांतही पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. जूनपासून ते आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ३ हजार ९६० गावांतील १६ लाख १४ हजार ४२३ शेतकरी बाधित झाले.
यात विभागात बारा लाख ८१ हजार हेक्टरवरील पिके नष्ठ झाली. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु आतापर्यंत केवळ ६४ टक्केच क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सर्वच जिल्ह्यात नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नुकसानीच्या मदतीचा प्रस्तावही रखडला आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतर विभागीय प्रशासनाकडून शासनाकडे मदतीसाठी आवश्यक निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख १४ हजार १५६ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ९३८ हेक्टर, परभणी जिल्ह्यात १ लाख २७ हजार ७६६, बीड जिल्ह्यात ३३ हजार ३२२ तर लातूर जिल्ह्यात २ लाख ७४ हजार ८७७, धाराशिव जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ९२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील १७ हजार ४६४ हेक्टर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४१ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.