Due to infighting, the Shiv Sena won only 13 seats in Sambhaji Nagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसे-नेची वाताहत झाली. जिल्ह्यात सध्या शिवसे नेचा एक खासदार आणि सहा आमदार आहेत. त्याच बळावर शिवसेनेने महापालिकेत सर्वाधिक ९७ उमेदवार उतरविले होते. परंतु त्यातील केवळ १३ जागांवरच पक्षाला यश मिळाले. मंत्री, आमदारांनी ठराविक प्रभागातच जोर लावल्याने त्यांची मुले विजयी झाली. इतर प्रभागांत मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मागील तीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेना दुभंगली, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे शिंदेंच्या शिवसेनेने खासदारकी मिळविली. पुढे विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणत आपलीच खरी शिव सेना असल्याचे जाहीर केले.
सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेकडे आहे. महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून भाजपसोबतच युती तुटली व शिवसेनेचे स्वबळावर ९७उमेदवार मैदानात उतरविले. मात्र, पक्षाला केवळ १३ जागा मिळू शकल्या. तर भाजपने ५७जागांवर यश मिळविले. शिवसेनेच्या या पराभवाला पक्षातील अंतर्गत गटबाजी, नेत्यांचे दुर्लक्ष हेच कारणीभूत झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा शिरसाट यांना उमेदवारी दिली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी शिरसाट यांनी सर्व लक्ष केंद्रीत केले. पक्षाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव त्रब्रीकेश हे गुलमंडी प्रभागातून निवडणूक रिंगणात होते.
जैस्वाल यांनीदेखील त्यांच्या मुलासाठीच जोर लावला. त्यामुळे या नेत्यांची मुले विजयी झाली. परंतु त्यांनी इतर प्रभागांमध्ये लक्षच घातले नसल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. तर पक्षाचे खासदार संदीपान भुमरे हे टीव्ही सेंटर भागातील आपल्या एक दोन समर्थकांच्याच विजयासाठी प्रयत्नशील होते.
पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमधून आपल्या समर्थकांना तिकिटे मिळवून दिले. ते स्वतः ही उमेदवार होते. त्यामुळे त्यांनीही स्वतः च्या प्रभागावर लक्ष केंद्रीत केले. या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांकडून आपला पक्षांतर्गत स्पर्धक वरचढ ठरू नये यासाठी आपल्याच पक्षातील उमेदवारांना पाडण्यासाठी विरोधकांनाही रसद पुरविल्याची चर्चा आहे.
पक्षाचे आमदार प्रचारापासून दूरच
जिल्ह्यात ग्रामीण भागात शिवसेनेचे चार आमदार आहेत. यापैकी आमदार रमेश बोरनारे, संजय जाधव, विलास भुमरे हे मनपा निवडणुकीच्या प्रचारापासून अंतर राखून होते. तुरळक ठिकाणचे दौरे वगळता त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी जोर लावला नाही. तर आमदार अब्दुल सत्तार हे वैद्यकीय कारणाने प्रचारापासून पूर्णपणे दूर होते.