

Traditional voters in the city have turned their backs on the national party, Congress
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडे पांरपरिक मतदारांची पाठ फिरवल्याचे मतमोजणीनंतर समोर आले असून महापालिका निवडणुकीत २९ प्रभागांतील ११५ जागांपैकी काँग्रेसने तब्बल ७१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र निकालात पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या पराभवाने शहर काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी, अंतर्गत कलह आणि नेतृत्वाचा अभाव चव्हाट्यावर आला असून वरिष्ठ नेतृत्वाकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
गेल्या निवडणुकीत ११ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि नाराजीनाट्याचा यंदाच्या निवडणुकीत फटका बसला. निवडणूक काळात स्टार प्रचारकांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, विशेषतः पाणीटंचाईसारख्या ज्वलंत विषयावर काँग्रेसकडून ठोस भूमिका मांडण्यात अपयश आले.
विरोधी पक्षात असूनही शहर काँग्रेसकडून ना आंदोलन, ना निर्देशने, अशी निष्क्रियता दिसून आली. तसेच या निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण झाले असून पारंपरिक मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात एमआयएमकडे वळल्याचे चित्र आहे. तर दलित मतदार वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाला असून मराठा मतदारांनी इतर राजकीय पक्षांना पसंती दिली.
त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे वास्तव समोर आले. याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्या निकालानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली. त्याचा परिणाम थेट महापालिका निवडणुकीत जाणवला.
अपेक्षित यश मिळेल की नाही, याबाबत खुद्द पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला होता. तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यावरून शहर काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी, नेतृत्वाचा अभाव आणि मतदारांपासून अंतर निर्माण झाल्याचे समोर आले.