Dr. Jyeshtharaj Joshi : सर्व मिळून आपल्या देशाला समृद्ध करु File Photo
छत्रपती संभाजीनगर

Dr. Jyeshtharaj Joshi : सर्व मिळून आपल्या देशाला समृद्ध करु

पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी, एमजीएममध्ये राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

Dr. Jyeshtharaj Joshi: Let us all together make our country prosperous

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रडणारे आणि तक्रारी सांगणारे आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत. कारणे सांगणे आणि रडत बसण्याने आयुष्यात काहीही होणार नाही. हसत, आनंदी राहत, कार्यरत राहणे आवश्यक असून, आपण सर्व मिळून आपल्या देशाला समृद्ध करू शकतो, असे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती तथा पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी यावेळी केले.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेच्या ४१ व्या वार्षिक अधिवेशनानिमित्त आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे गुरुवारी (दि.८) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी, पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे संमेलनाध्यक्ष डॉ. मोहनराव देशमुख, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अमन बगाडे, डॉ. अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई आदी उपस्थित होते.

पद्मभूषण जोशी म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाची समृद्धी साधण्याच्या उद्देशाने जगातील सर्व विद्यापीठे कार्यरत आहेत. नवीन ज्ञाननिर्मितीत भर घालत समाजाच्या भल्यासाठी कार्य करणे हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे. सुंदर आणि अर्थपूर्ण आयुष्य घडवायचे असेल तर आपण आयुष्यात नेमके काय करतोय, याचे सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. वेळ एकदा फुकट गेला, तर दर्जेदार संशोधन घडत नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, तत्वज्ञान आणि विज्ञान हे एकमेकांशी परस्परपूरक आहेत. तत्वज्ञानाशिवाय आणि अध्यात्माशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिपूर्ण होऊ शकत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्वज्ञानाचा प्रचार आपण अधिक वेगाने करू शकतो. अध्यक्षीय समारोप कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनीलदत्त गवरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. अनिता फुलवाडे यांनी केले, तर डॉ. राजू सोनवणे यांनी आभार मानले.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख म्हणाले, शिक्षण हे केवळ विज्ञान वा ज्ञानापुरते मर्यादित नसून माणसाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. आज प्रगतीचे मोजमाप केवळ जीडीपीने करता येणार नाही. भविष्यातील खरे मापदंड म्हणजे कल्याण, शाश्वतता, सन्मान आणि करुणा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT