Do not delay work: MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यानंतर सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या विविध विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेत विकासकामांचा धडाका वाढवण्याचे संकेत दिले. प्रलंबित कामांचा पाढा वाचत त्यांनी अधिकाऱ्यांना ठोस, स्पष्ट आणि वेळबद्ध निर्देश देत कामात ढिलाई नको, परिणाम दिसला पाहिजे असा कडक इशारा दिला.
बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते विकास योजनेंतर्गत प्रलंबित अंदाजपत्रके तातडीने पूर्ण करून वर्क ऑर्डर जारी करण्याचे आदेश देण्यात आले. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे निर्देश देत त्यांनी कामांना वेग देण्यावर भर दिला. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने करावा, टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य द्यावे तसेच विहीर अधिग्रहण प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत तत्काळ कामे सुरू होतील अशी ठिकाणे निश्चित करून नियोजन वेळेत पूर्ण करावे, असे सांगण्यात आले. पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळावे, असे निर्देश देण्यात आले. विहीर व गायगोठा अनुदानाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून निधी वितरण गतिमान करण्यास सांगण्यात आले. रोजगार हमी योजनेंतर्गत अधिक कामे सुरू करून कामगारांना वेळेत मजुरी देण्यावरही विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी
लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते, डिवायएसपी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, कृषी अधिकारी संदीप जगताप, बिडीओ दादाराव अहिरे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, पोनी शेषराव उदार यांच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
वृक्षलागवड प्रभावीपणे राबवा
वन विभागाने वृक्षलागवड मोहीम प्रभावीपणे राबवावी, वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कडक कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.