District bank agrees to waive off loans worth Rs 1582 crore given to farmers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे आसमानी संकट कोसळल्याने शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची बँक असा लौकिक असलेल्या जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना वाटलेले १५८२ कोटी रुपये कर्ज माफ करावे, अशी मागणी संचालकांनी सोमवारी (दि.२९) सर्वसाधारण सभेत केली. त्यावर दहा दिवसांत कर्जमाफीचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवू, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी बँकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील, संचालक आ. अब्दुल सत्तार, अंबादास दानवे, रमेश बोरन ारे, जगन्नाथ काळे यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दानवे यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या स्थितीकडे लक्ष वेधताना बँकेने ज्या शेतकऱ्याला कर्ज दिले, त्यांच्या कर्जमाफीचा ठराव घेऊन राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली. इतर सभासद शेतकऱ्यांनीही सरकारने कर्जमाफीची रक्कम बँकेकडे वर्ग करावी आणि दिलासा द्यावा, असा आग्रह धरला. तर सध्या बँकेकडे कर्जाची मागणी केलेल्या ४० हजार १५० जणांसाठी ८३३ कोटी रुपये लागणार आहेत. बँक डबघाईस येणार नाही याची खबरदारी घेऊन निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठराव राज्य शासनाला दहा दिवसांत पाठविण्यात येईल. बँकेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करील, असे सत्तार यांनी जाहीर केले.
सभे दरम्यान बँकेच्या सादर ताळेबंद नूसार २०२४-२५ या आर्थिक वर्षांत बँकेच्या १३८ शाखांनी चांगली कामगिरी केली आहे. बँकेला २२ कोटी ८७ लाख निव्वळ नफा झाला आहे. बँकेचा ढोबळ एनपीए २४.६२ टक्क्यांवरून २२.६७ टक्क्यांवर आला आहे. बँक स्वभांडवलावर कर्ज वाटप करीत आहे. बँकेत १८५ कोटी गुंतवणूक वाढली असून कर्ज वाटपात ७६ कोटींची वाढ झाली आहे. बँकेच्या मालमत्तेत १३ कोटींची वाढ झाल्याचे अध्यक्ष गाढे यांनी सांगितले.