'Dial-112' proves to be a lifesaver in emergencies; rural police response
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नागरिकांवर अचानक ओढवणाऱ्या संकटावेळी पोलिसांची 'डायल-११२' ही यंत्रणा खऱ्या अर्थाने 'तारणहार' ठरत आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाने जानेवारी ते जून या केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८ हजार ३६७आपत्कालीन कॉल्सला तात्काळ प्रतिसाद देत संकटात धावून गेले. अनेकांचे प्राणही वाचवले. गोदावरी नदीत उडी मारणाऱ्या तरुणीचा जीव वाचवणे असो वा हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधून पालकांच्या स्वाधीन करणे असो, 'डायल-११२' अल्पावधीत घटनास्थळी पोहोचून उत्तम कामगिरी च्या पथकांनी बजावली आहे. नियंत्रण कक्ष आणि संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभावी समन्वयामुळे अनेक गंभीर प्रसंग यशस्वीपणे हाताळण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसी तत्परतेच्या प्रातिनिधिक घटना :
१) गोदावरीत आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला पाटेगाव पुलावरून (दि. ८ जून) नदीत उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका मानसिक तणावातील तरुणीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. तिच्याशी संवाद साधून तिला धीर दिला व सुरक्षित ताब्यात घेत मोठा अनर्थ टाळला.
२) पैठणमध्ये हरवलेली ३ मुले काही तासांत शोधली : संत नगरमधून खेळायला गेलेली तीन अल्पवयीन मुले (दि. ११ जून) रात्री उशिरापर्यंत न परतल्याने पालकांनी ११२ वर कॉल केला. पोलिसांनी नाथ मंदिर आणि बाजारपेठ परिसरात शोधमोहीम राबवून मुलांना सुरक्षितपणे व्यापक पालकांच्या स्वाधीन केले. ३) गोवंशाची कत्तलीपासून सुटका : फुलंब्री-जळगाव रोडवर (दि. १४ जून) एका टेम्पोतून अत्यंत अमानुषपणे चाललेली गोवंशाची वाहतूक ईआरव्ही पथकाने मध्यरात्री रोखली. पोलिसांनी दोन जनावरांची सुटका करत वाहन जप्त केले.
४) चोरीला गेलेली क्रूझर सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त : आहिल्यानगर जिल्ह्यातून चोरीला गेलेली 'फोर्स क्रूझर' (दि. १७ जून) कचनेर परिसरात जीपीएसद्वारे ट्रॅक करण्यात आली. चिखलठाणा पोलिसांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम राबवून पोलिसांनी वाहन सुरक्षित ताब्यात घेतले.
नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा "कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, चोरी, महिलांची छेडछाड किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 'डायल-११२' वर संपर्क साधावा. तुमची एक माहिती एखाद्याचा जीव वाचवू शकते किंवा मोठा गुन्हा रोखू शकते.- प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक