छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जानेवारीपासून ते १५ मे पर्यंतच्या साडेचार महिन्यांत डेंग्यूचे तब्बल २६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ११ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १६ डेंग्यू बाधित हे शहरी भागात आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले असून जिल्ह्यात डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
दरवर्षी १६ मे रोजी डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीचे घोषवाक्य एकत्रित या, कृती करा, डेंग्यू दुरीकरण करा. या दिनानिमित्त जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंध व जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. डेंग्यू हा डासांमार्फत पसरणारा आजार असून नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवणे, घराभोवती पाणी साचू न देणे तसेच आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालये व ग्रामस्तरावर जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यामध्ये डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, डास निर्मूलन, वेळेवर उपचार याबाबत माहिती देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरभेटी देऊन नागरिकांना पाण्याच्या टाक्या, कूलर, टायर, फुलदाण्या आदी ठिकाणी पाणी साचू न देण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांच्या नियोजनाने जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
स्वच्छ परिसर, डेंग्यूमुक्त परिसर
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ किंवा त्वचेवर पुरळ अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालय किंवा आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. स्वच्छ परिसर, डेंग्यूमुक्त परिसर हा संदेश देत नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.