Demand to stay the promotion process in the Zilla Parishad Education Department
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार टीईटी/सीटीईटी पात्रता आवश्यक आहे. मात्र सध्या केवळ सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी पात्र ठरलेल्या शिक्षकांचाच विचार केला जात असल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे. या संदर्भातील प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित असून, मुंबई व नागपूर खंडपीठाने आजपर्यंत टीईटी पात्र ठरलेल्या शिक्षकांचाही पदोन्नती प्रक्रियेत समावेश करण्याबाबत आदेश दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार नियोजन समितीची बैठक, निवडसूची आणि रिक्त पदांच्या गणनेबाबतही आक्षेप घेण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या पात्रतेचा आधार घेतला जात असेल, तर रिक्त पदांचाही विचार त्याच कालावधीपर्यंतच करावा; अन्यथा आजपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा दामू बनसोडे यांनी २८ जून २०२६ रोजी पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलेले असतानाही प्रक्रिया घाईघाईने राबविली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची बदली झाल्यानंतरही पदोन्नती प्रक्रिया सुरू ठेवली जात असून, यामागे आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असल्याचा गंभीर आरोपही पठाडे यांनी निवेदनातून केला आहे.