छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या अवघ्या 5 लाख रुपयांच्या कर्जापोटी एका तरुण सिव्हिल इंजिनीअरला व्याजाच्या विळख्यात ओढून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुद्दल आणि व्याजासह तब्बल 31.50 लाख रुपये परत करूनही सावकाराचे समाधान झाले नाही. त्याने या तरुणाचे अपहरण करून, कुटुंबाला संपवण्याची धमकी देत त्याची अडीच एकर जमीनही बळकावली.
याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लखन राजू साबळे (33, रा. बिजवाडी) आणि विकी देविदास शिंदे (33, रा. बिजवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यंकटेश राजू ढगे आणि प्रशांत बंडू ढाकणे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
सासू-सासऱ्यांनी दागिने मोडून दिले पैसे
मुलाची सुटका करण्यासाठी विश्वजीत यांच्या सासू प्रतिभा देशमुख यांनी मार्च 2025 मध्ये साडेपंधरा लाख रुपयांचे दोन चेक आरोपींना दिले. अशा प्रकारे 5 लाखांच्या बदल्यात आतापर्यंत 31 लाख 50 हजार रुपये आरोपींना मिळाले. तरीही जमीन परत करण्यासाठी आरोपींनी पुन्हा 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून अखेर देशमुख कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत.
अपहरण करून जमिनीची जबरदस्तीने रजिस्ट्री
5 डिसेंबर 2024 रोजी आरोपींनी विश्वजीत यांचे अपहरण करून त्यांना कन्नड येथे नेले. पैसे नसतील तर जमीन व्यंकटेश ढगेच्या नावावर करून दे, असा तगादा लावत त्यांना एमआयडीसी चिकलठाणा भागात नेऊन चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. कुटुंबाच्या जीवाच्या भीतीने विश्वजीत यांनी करंजखेड येथील आपली अडीच एकर जमीन व्यंकटेशच्या नावावर करून दिली.
असा झाला अन्याय
मूळ कर्ज : 5 लाख रुपये.
परतफेड : 31.50 लाख रुपये (सुरुवातीला 16 लाख, नंतर साडेपंधरा लाख).
झालेले नुकसान : करंजखेड येथील अडीच एकर बागायती जमीन बळकावली.
आणखी मागणी : जमीन परत करण्यासाठी 25 लाखांची नवी खंडणी.