Chilies priced at ₹25–30 per kg in Golegaon market
सिल्लोड / सराटी, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव मिरची बाजारभावात व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. एक दिवस पन्नास रुपये प्रतिकिलोचा दर द्यायचा, तर दुसऱ्या दिवशी आवक वाढल्याचे कारण पुढे करून दुपटीहून दर कमी करीत २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर द्यायचा, अशी पध्दत सुरू आहे. शेतकऱ्यांमधून व्यापाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव मिरची बाजारात मंगळवारी (दि.५) व्यापाऱ्यांनी २५ ते ३० रुपये किलो दराने मिरची खरेदी केली. सराटी बोदवड - वसई - पिंपळदरी परिसरातील मिरचीला कवडीमोल भाव मिळाल्याने परिसरातील शेतकरीवर्गातून व्यापाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी बोदवड - वसई - पिंपळदरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी गेल्या एक दोन वर्षांपासून मिरची पीक वरदानच ठरत आहे. यावर्षी मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मे अखेरपासून लागवड केलेल्या मिरचीला जगविण्यासाठी मेहनत घेतली आहे. पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या विहिरी आटल्या होत्या.
टँकरव्दारे विकतचे पाणी घेऊन मिरची पीक कसेबसे जगवले. अनेक शेतकऱ्यांना एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत टँकरचा पाण्याचा भुर्दंड बसला आहे. जवळपास एकरी एक लाखाहून अधिकचा खर्च मिरची पिकासाठी येत असतानाच व्यापारीवर्गाकडून मात्र एकप्रकारे लुटमार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी मिरची पिकावर केलेला खर्चही निघणार नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिरचीचे पोते मोजताना अन्याय
गोळेगाव मिरची बाजार व्यापाऱ्यांकडून मिरची मोजताना मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावा-गावांतील अनेक शेतकरी माल लोडिंग गाड्यांत भरून देतात. मिरची व्यापारी खरेदी करतानाचा वेगळा भाव अन् काट्यावर मोजतानाचा वेगळा भाव फरक ठेवून एका मिरची पोत्यातून एक - दोन किलो मिरची समोर काढत शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करीत असल्याने नाराजी आहे. मिरची पोते मोजताना व्यापाऱ्यांकडून होत असलेली मनमानीही थांबवावी, संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.