छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा पाया भक्कम होतो; मात्र मागील साडेतीन ते चार वर्षांच्या प्रशासक काळात विकासकामांना ब्रेक लागला. अधिकारी गावपातळीपर्यंत पोहोचले नसल्याने अनेक योजना रखडल्या आणि विकासाची गती मंदावली, असे सांगत, हा बॅकलॉग आता भरून काढणार, असा ठाम निर्धार जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश गलांडे व उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष गलांडे म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक कल्याण या मूलभूत क्षेत्रांतील कामांना तातडीने गती दिली जाणार आहे. गावपातळीवरील अडचणी सोडवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर राहणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे प्रशासक काळात निधीअभावी कामही रखडले. आता शासनदरबारी पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून हे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्णत्वास आल्यावर सर्व विभाग एका छताखाली आल्यास कामकाजाला गती मिळेल, असेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गलांडे त्यांनी सांगितले.
इमारतीसाठी शासनाकडूनच निधी घेणार
जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मिळवण्यात येईल. या अगोदर इमारतीसाठी सेसचा काही निधीचा वापर करण्यात आला होता; मात्र आता सेसचा निधी वापरण्यात येणार नाही. सेसचा पैसा महत्त्वाच्या योजनांसाठी वापरणार असल्याचा विश्वासही अध्यक्ष गलांडे यांनी व्यक्त केला.