गंगापूर: भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रबळ संत, महंतांना लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देवगड संस्थानचे हभप भास्करगिरी बाबा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भास्करगिरी महाराज यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. आपण राजकारण, सत्ताकारण व कोणत्याही पक्षापासून दूरच राहणार असल्याचे त्यांनी 'दैनिक पुढारी'ला पत्रकाद्वारे कळविले आहे. Bhaskargiri Maharaj
भास्करगिरी महाराज यांना नेवाशातून भाजपची उमेदवारी? अशा मथळ्याखाली एका दैनिकाने बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी फेटाळून लावत महाराज म्हणाले की, अशा बातम्यांमुळे मी व्यथित झालो आहे. ५० वर्षांपूर्वी सद्गुरु किसनगिरी बाबांनी देवगडचे उत्तराधिकारी म्हणून माझी नियुक्ती केली. हरी चिंतन धर्म, कार्य कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार करणे आदी कामे गुरूच्या आदेशानुसार १९७५ पासून करत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी लोक वेगवेगळ्या जाती धर्माची असतात. या व्यक्तींकडून देश व राज्य सेवेचे कार्य उत्तम घडत राहो. परंतु, वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय पक्ष तथा पक्ष संघटनेशी दूर दूर पर्यंत संबंध नाही. कोणतेही राजकीय पद भोगण्याची अभिलाषासुद्धा आम्हाला नाही. Bhaskargiri Maharaj
आजपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागही नोंदविला नाही. व भविष्यातही सहभाग घेणार नाही. कुठल्याही पक्षाबरोबर आमचे संबंध नाहीत. सर्व पक्ष आमच्यासाठी समान आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्मकार्य म्हणून आम्ही प्रभु रामचंद्र मंदिरासाठी सक्रिय सहभाग नोंदविला होता. तथापि यामध्ये कुठल्याही संघटनेचा संबंध नव्हता. राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा आम्ही स्वप्नातही विचार केलेला नाही. जी मंडळी या क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना शुभेच्छा. कुठलाही गैरसमज करू नये. कृपया अशा बातम्याही कोणी प्रसारित करू नये, अशी विनंती भास्करगिरी बाबा यांनी केली आहे.
हेही वाचा