छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेली नवीन पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या योजनेतून सध्या जुन्या वितरण व्यवस्थेत १० एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, १२ जूनपर्यंत ही क्षमता ५० एमएलडीपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.५) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्त येडगे म्हणाले की, नवीन योजनेअंतर्गत १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले असून २००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नवीन आणि विद्यमान यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीला ५० एमएलडी तर पुढील काही महिन्यांत शहराला तब्बल २२० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.
तसेच या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ५५ जलकुंभांपैकी ४५ जलकुंभांचे काम सुरू असून १९ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये नो नेटवर्क एरियामधील १० जलकुंभांचा समावेश आहे. उर्वरित २७ जलकुंभांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर अद्याप सुरू न झालेल्या १० जलकुंभांची कामेही संबंधित कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान शहरातील १९०० किलोमीटर अंतर्गत जलवाहिनीपैकी सुमारे १३०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्यापैकी केवळ २०० किलोमीटर पाईपलाईनची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाल्याने उर्वरित चाचण्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर भर
नवीन योजनेतून पाणी उपलब्ध झाल्यानंतर ते प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य दाबाने आणि नियोजित वेळेत पोहोचावे यासाठी वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कमी दाब, असमतोल वितरण आणि वारंवार उद्भवणाऱ्या तक्रारी कमी करण्यासाठी नवीन व जुन्या यंत्रणेचे समन्वयित जाळे विकसित केले जात आहे.
अनधिकृत नळजोडण्यांना बसणार आळा
नो नेटवर्क एरियामधील नागरिकांना अधिकृत नळजोडण्या देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील जुन्या जलवाहिन्या कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनधिकृत नळजोडण्यांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांना पाणीटंचाईतून मिळेल दिलासा- शहरासाठी २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून ९०० मिलिमीटर व्यासाची पाणी योजना शंभर टक्के कार्यान्वित झाल्यानंतर शहराला वाढीव पाणी मिळत आहे. त्यासोबतच आता या पाणी योजनेतून टप्प्या-टप्प्याने पाणी वाढविले जात आहे. त्यानंतर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईतून दिलासा मिळेल.समीर राजुरकर, महापौर